नागपूर: आपल्या सोबत आलेले खासदार आणि आमदार यांपैकी एकाचा जरी निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडून शेती करायला जाईल, अशी गर्जना करणारे एकनाथ शिंदे यांनी तीन खासदारांचे तिकीट नाकारून त्यांना निवडणुकीपासूनच वंचित ठेवले, त्यामुळे ते आता राजकीय निवृत्ती घेतील का ? असा सवाल शिवसेना (ठाकरे गट) नेते आ. भास्कर जाधव यांनी केला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

भास्कर जाधव म्हणाले शिंदे गटाने हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करून नंतर त्यांना वगळले, वाशीम-यवतमाळच्या भावना गवळी, रामटेकचे कृपाल तुमाने या विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली. नाशिकचे हेंमत गोडसे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातील उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही. शिंदे यांनी विधानसभेत सांगितले होते की, माझ्यासोबत आलेल्या खासदार, आमदारांपैकी एकाचा जरी पराभव झाला तर मी राजकारण सोडून शेती करेल. आता तर त्यांनी तीन खासदारांना निवडणुकीपासूनच वंचित ठेवले. त्यामुळे ते आता राजकीय निवृत्ती घेतील काय?. ‘गद्दारांनो समजझावो, सुधर जावो’, असे जाधव म्हणाले.

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र, आम्ही एकमेकांना पक्षातील…”, नाना पटोलेंचे वक्तव्य; म्हणाले, “वंचितकडून सातत्याने…”

भाजपला सेना संपवायची आहे.

भारतीय जनता पक्षाला शिवसेना संपवायची आहे, ती उद्धव ठाकरे यांची मुळ शिवसेना असो किंवा शिंदे यांच्यासोबतची शिवसेना असो हे शिंदेंसोबत गेलेल्यांनी समजून घ्यावे. भाजपचे तेच प्रयत्न आहे. ज्या सर्वेक्षणाचा आधार भाजप घेत आहे तो कोणी केला ? शिवसेनेच्या जागांवर सर्वेक्षण करण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला ? असा सवाल जाधव यांनी केला. विद्यमान खासदारांना तिकीट नाकारणे ही धोक्याची घंटा आहे, शिंदेसोबत गेलेल्यांनी हे लक्षात घ्यावे व कार्यकर्त्यांनी परत मुळ शिवसेनेकडे यावे, असे आवाहन जाधव यांनी केले.