नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून शहरात हत्याकांडाची मालिका अद्यापही थांबलेली नाही. बुधवारी शहरात आणखी एक हत्याकांड उघडकीस आले आहे. गेल्या एप्रिल महिन्यात दर जवळपास दुसऱ्या दिवशी हत्याकांड घडले असून त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.
वाडीतील दारुच्या भट्टीत आलेल्या एका ग्राहकाच्या हातातून दारूचा ग्लास खाली पडल्याने फुटला. एवढ्या किरकोळ कारणावरुन एका ग्राहकाचा दारू भट्टीवरील व्यवस्थापकाने आणि कर्मचाऱ्यांनी काठीने मारुन खून करण्यात आला. सूरज सुभाष भलावी (२७, सोनबानगर, वाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली.
सूरज भलावी हा बेरोजगार असून तो मिळेल ते काम करुन दारु पितो. वाडीतील खडगाव रोडवरील सायरे देशी दारुच्या भट्टीमध्ये तो मंगळवारी रात्री दारु पिण्यासाठी गेला होता. दारु पीत असताना सूरजच्या हातातून काचेचा ग्लास खाली पडून फुटला. त्या कारणावरुन दारुभट्टीच्या मालक सूरजवर ओरडला. त्याने दारुभट्टीतील नोकर विशाल दिवेकर, रोहित वरखडे, संदीप चव्हाण, सुनील गोटे आणि प्रभाकर चिंतामणी यांच्यासह अन्य काहींनी सूरजला मारहाण केली. त्यानंतर त्याला उचलून एका खोलीत नेले आणि त्याला काठीने मारहाण केली.
गंभीर जखमी अवस्थेत त्याला रस्त्यावर नेऊन फेकले. रात्रभर तो तेथेच तडफडत होता. नागरिकांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन पाच आरोपींना अटक केली. मात्र, दारुभट्टीच्या मालकाविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने संशय निर्माण झाला आहे.
गुन्हे शाखेची पथके करतात तरी काय?
पूर्वी नागपूर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकांचा महाराष्ट्रभर दबदबा होता. मात्र आता गुन्हे शाखेची पथके तपास कमी आणि वसुली जास्त अशी भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. गुन्हे शाखेच्या वसुलीबाजीपणामुळेच शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.