नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विभागातील चिमूर वनक्षेत्रात कक्ष क्रमांक ३७१ मध्ये वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, राज्यात एक जानेवारीपासून ते आतापर्यंत २५ पेक्षा अधिक वाघ मृत्युमुखी पडले आहेत.
शेडेगाव परिसरात अलीकडेच काही महिन्यांपूर्वी जंगल सफारी सुरू करण्यात आली. १९ मेदरम्यान याच परिसरात वाघाच्या नऊ ते दहा महिन्यांच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. अधिवासाच्या लढाईत दोन वाघांमध्ये झालेल्या झुंजीत हा मृत्यू झाला. त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली असून वाघाच्या अवघ्या नऊ ते दहा महिन्यांच्या बछड्याचा दुसऱ्या वाघासोबत झालेल्या झुंजीत मृत्यू झाला. त्यामुळे हे दोन्ही वाघ एकाच वाघिणीचे बछडे असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. माहिती मिळताच वनखात्यचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
राज्यात २०२५ची सुरुवात वाघांच्या मृत्यूने झाली आणि पहिल्यांदाच जानेवारी संपायचा असताना एक-दोन नाही तर अवघ्या २२ दिवसांत ११ वाघ मृत्युमुखी पडले. त्यामुळे पुन्हा एकदा वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे गांभीर्य प्रश्नांमध्ये अडकले आहे. २०२३च्या तुलनेत २०२४ या वर्षात वाघांच्या मृत्यूची संख्या ५० टक्क्यांनी कमी झाली. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक महिन्याच्या आत ११ वाघ मृत्यूमुखी पडले. डिसेंबर, जानेवारी या दोन महिन्यात वाघांच्या मृत्यूच्या अनेक घटना समोर येतात. यावर्षी डिसेंबरमध्ये हे प्रमाण वाढले आहे. त्यातही दोन मृत्यू शिकारीमुळे तर दोन मृत्यू संशयास्पद असल्याचे आढळून आले.
वाघांची शिकार करणे, त्यांचे तुकडे करणे, वाघांची नखे, दात गायब करणे यातून शिकाऱ्यांनी वनखात्याला इशारा दिला आहे. याकडे खाते गांभीर्याने पाहणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. वाघांची संख्या वाढत असली तरीही वाघांच्या मृत्यूच्या घटनांमध्येही राज्य आघाडीवर असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून सहा महिन्यांत देशभरात एकूण ९०पेक्षा अधिक वाघांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू प्रामुख्याने वाघांतील झुंजी, अपघात, बेकायदेशीर शिकार आणि नैसर्गिक कारणांमुळे झालेले आहेत. विशेष म्हणजे, या मृत्यूपैकी सर्वाधिक २५ पेक्षा अधिक वाघांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे.