सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या, सरकारी योजनांची प्रसिद्धी, प्रचार करणाऱ्या राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागाला सध्या मनुष्यबळाची चणचण आहे. या विभागात अनेक पदे रिक्त आहेत.

महासंचालकाच्या अखत्यारीत मुंबईत संचालकांची पाच, तर विभागीय पातळीवर उपसंचालकांची सहा पदे आहेत.

मुंबईतील संचालक (प्रशासन) अजय आंबेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. विभागीय उपसंचालकांपैकी अमरावती विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी मे महिन्यात निवृत्त होणार आहेत. कोल्हापूर विभागाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे आणि नाशिकमध्येही माहिती उपसंचालकांचे पद रिक्त आहे. चंद्रपूर आणि गोंदियामध्ये जिल्हा माहिती अधिकारी हे पद रिक्त आहे. चंद्रपूरचा अतिरिक्त कार्यभार वर्धा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे, तर गोंदियाचा अतिरिक्त कार्यभार भंडारा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे आहे. जिल्हापातळीवरही वर्ग -२ आणि वर्ग-३ ची साधारणपणे निम्मी पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाज अधिक असते. त्यामुळे या खात्यात पदभरतीची प्रक्रिया तातडीने राबवण्याची गरज आहे. शासनाने इतर काही विभागांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे, हे येथे उल्लेखनीय. माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रिक्तपदे सर्वच विभागांत आहेत. आम्ही इतर अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार दिल्याने कामकाजावर परिणाम होत नाही. ही पदे भरली जावी म्हणून शासनाकडे प्रयत्न करू.