नगरधन किल्ला परिसरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार

कलिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २३ नोव्हेंबरला कालिदास संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचा प्रारंभ रामटेकच्या नगरधन किल्ला परिसरात होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

गेल्यावर्षी कालिदास महोत्सवाचे उद्घाटन कालिदास स्मारक परिसरात करण्यात आले. यावेळी रसिकांची मागणी बघता सौंयर्दीकरण करण्यात आलेल्या नगरधन परिसरात होणार आहे. यावर्षी कुमारसंभव ब्रिद आहे. नटराज शिवा हे प्रतीक राहणार असून यावेळचा महोत्सव गुरू-शिष्य परंपरेवर आधारित आहे. चार दिवस होणाऱ्या या संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी  १२ वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात लेखक अमिश त्रिपाठी यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी नगरधन परिसरात उद्घाटन होईल. उद्घाटन समारंभानंतर ज्येष्ठ पखवाजवादक पं. भवानी शंकर यांचे पखवाज वादन आणि मुलगा उमा शंकर यांचे शास्त्रीय गायन अशी जुगलबंदी अनुभवयास मिळणार आहे. राजा आणि राधा रेड्डी यांच्या शिष्या भावना आणि यामिनी रेड्डी यांचे कुचीपुडी नृत्य आणि त्यानंतर समारोप गुरू  भारती बंधू यांच्या सुफी गायनाने होणार आहे, या महोत्सवाची माहिती देताना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी वसंतराव देशपांडे सभागृहात ज्येष्ठ संतुरवादक शिवकुमार शर्मा यांचे चिरंजीव राहुल शर्मा यांचे संतुरवादन होणार आहे. त्यांना पं. रामकुमार शर्मा साथसंगत करतील. त्यानंतर पं. कुमार गंधर्व यांच्या कन्या कलापिनी कोमकली यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. २२ नोव्हेंबरला पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्या देबोप्रिया आणि सुचिष्मिता चटर्जी यांचे बासरीवादन होणार आहे. ओजस ओडिया तबलासंगत करतील. २३ नोव्हेंबरला ठुमरी गायिका गिरीजा देवी यांचे शिष्य राहुल आणि रोहीत मिश्रा यांचे शास्त्रीय गायन, कथक नृत्यागना शमा भाटे आणि त्यांच्या शिष्याचा कथक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. या संगीत समारोहाचा समारोप पं. अजय चक्रवती यांच्या शास्त्रीय गायनाने होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिप.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बालकवडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.

नगरधनला महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्यामुळे कन्हान ते नगरधन हा रस्ता तयार करण्यात येत असून त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. कालिदास स्मारक आणि गड मंदिराचा विकास करण्यासाठी १७५ कोटींचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्या संदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. नगरधनच्या विकासासाठी २५ कोटींचा प्रस्ताव आहे. या महोत्सवासाठी राज्य सरकारने २० लाख रुपये मंजूर केले आहेत, शिवाय काही प्रायोजकांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही. नागपूर शहरात सभागृह बांधण्यासाठी जागेचा शोध घेणे सुरू आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वसंतराव नाईक सभागृहाचे नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यासाठी विद्यापीठाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यांची मंजुरी मिळाली की एनआयटीच्या माध्यमातून ते बांधण्यात येईल आणि त्याला भवभुती यांचे नावे देण्यात येणार असल्याचे अनुपकुमार यांनी सांगितले.