बुलढाणा: भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांचे गुरुवारी , २६ जून रोजी बुलढाणा शहरात दुपारी आगमन झाले.मात्र याची कुणकुण लागताच प्रसिद्धी माध्यमानी त्यांना बुलढाणा चिखली राज्य मार्गावरील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गाठलेच! पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याशी अर्धा तास चर्चा केल्यावर त्यांनी माध्यम प्रतिनिधी समवेत चर्चा केली.
यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, आता आपण राज्य व्यापी भोंगामुक्त महाराष्ट्र अभियान राबविणार आहे. महानगरी मुंबईच्या पोलीस आयुक्तानी मुंबई मधील बहुतांश मस्जिद वरील बेकायदेशीर भोंगे काढले आहे. आपल्या माहितीप्रमाणे तब्बल १५०० मशीदी वरील बेकायदेशीर रित्या लावण्यात आलेले आणि पाच वेळा मोठ्याने वाजणारे भोंगे या मोहिमेत पोलिसांनी काढून टाकले आहे. जर महानगरी मुंबई मधील मशीदवरील भोंगे काही दिवसातच काढण्यात आले तर महाराष्ट्र राज्यातील मशीदवरील भोंगे का काढता येणार नाही? असा सवाल सोमय्या यावेळी उपस्थित केला. यामुळे आपण आता भोंगे मुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेतले आहे.
गुरुवारपासून बुलढाणा जिल्ह्यातून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. गुरूवारी संध्याकाळी अकोला येथे भेट देऊन या व अन्य विषयावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या समवेत चर्चा करणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या यासंदर्भातील आदेशाचा सरकार आणि आम्ही सन्मान करतो. त्यानुसारच भोंगे काढण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आपण बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेऊन त्यांनाही मुंबई प्रमाणे भोंगे काढण्याची कारवाई करावी, अशी विंनंती केल्याचे सोमय्या म्हणाले.
यापूर्वी सोमय्या यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांची भेट घेतली. यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी खालील माहिती दिली.बुलढाण्यात ३०० हून अधिक बंगला देशी, रोहिग्यांनी खोटे कागदपत्र दाखल करून जन्म प्रमाणपत्र मिळवले . बुलढाणा जिल्ह्यातील नायब तहसीलदारानी ३०० हून अधिक बेकायदेशीर प्रमाणपत्राचे आदेश दिल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला.ते सर्व आदेश रद्द करण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले असताना आजपर्यंत एकही प्रमाणपत्र परत घेण्यात आले नाही, अशी धक्का दायक माहितीही किरीट सोमय्या यांनी दिली. बेकायदेशीर प्रमाणपत्रातील सर्व नावे रद्द करण्याची कारवाई सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरीक्त काही ठिकाणी सरकारी दवाखान्यात एका वर्षाहून अधिक लोकांचे नाव बेकायदेशीरित्या जन्म नोंद करण्यात आल्या असून, मलकापूर शासकीय रुग्णालयात येथे तब्बल १४२६ बेकायदेशीर नोंदी करण्यात आल्या असल्याचे सोमय्या म्हणाले. याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करणार असून, सर्व बेकायदेशीर प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई सुरू होणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष विजयराज शिंदे, सचिव चंद्रकांत बरदे, उदय देशपांडे, मंदार बाहेकर आदि हजर होते.