लोकसत्ता टीम नागपूर : वर्धा मार्गावरील डबलडेकर उड्डाण पुलावरून मनीषनगरकडे जाण्यासाठी बांधलेल्या मनीषनगर उड्डाण पुलाच्या ‘लँडिंग’वरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘लँडिंग’च्या अगदी तोंडावरच चौक (महाजन आटा चक्की चौक) असल्याने पुलावरून सुसाट येणाऱ्या वाहनांमुळे चोवीस तास अपघाताची भीती कायम आहे. या चौकात आतापर्यंत बरेच अपघात घडले आहेत. शहरातील उड्डाण पुलामुळे वाहतूक व्यवस्था सुलभ आणि सुरळीत झाली. उड्डाण पुलाच्या निर्मितीमुळे शहरातील अनेक परिसरातील वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला. मात्र, शहरातील काही उड्डाण पुलाच्या लँडिंगचे नियोजन चुकल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. काही उड्डाण पुलावरून सुसाट धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली. परिणामी अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ झाली. वर्धा मार्गावरील डबल डेकर पुलावरून मनीषनगरकडे जाता यावे म्हणून बांधलेला मनीषनगर उड्डाण पूल हा सुद्धा याला अपवाद नाही. आणखी वाचा-गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा! अजनी चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ चौकापर्यंत असलेल्या सर्वाधिक लांबीच्या उड्डाण पुलामुळे सीताबर्डीकडून येणाऱ्या बऱ्याच वाहनांना रस्ता मोकळा झाला आहे. मात्र, उड्डाण पुलावरून मनीषनगरकडे जाण्यासाठी बांधलेल्या पुलामुळे सोय कमी आणि अडचणी अधिक वाढल्या. या पुलामुळे बेसा-बेलतरोडीकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या पुलाची लँडिंग चौकात होते. उड्डाण पुलावरून भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे महाजन आटा चक्की चौकात अपघाताची भीती निर्माण झाली आहे. पुलावरून उतरतानाच वाहनाचे अचानक ब्रेक लागल्यास एकाच वेळी तीन ते चार वाहने एकमेकांवर धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात भुयारी मार्गातही अडचणी वर्धा मार्गावरून मनीषनगरात जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. मुळात हा पूल एकेरी मार्गासाठी (फक्त मनीषनगरकडे जाण्यासाठी) आहे. मात्र अरुंद असूनही तेथे दुहेरी वाहतूक सुरू असून ही बाब अपघातासाठी कारणीभूत ठरली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या भुयारी मार्गात जवळपास ८ ते १० फूट पाणी साचते. पूर आला की भुयारी मार्ग बंद करण्यात येतो. मनीषनगरात जाण्यासाठी नागरिकांना पुन्हा मोठा तीन ते चार किमीचा फेरा घेण्याचा त्रास सहन करावा लागतो. आणखी वाचा-गोंदियात व्यावसायिक स्पर्धेतून रक्तपात; गोळीबारात वाळू व्यावसायिकाचा मृत्यू रस्ते अरुंद; विरुद्ध दिशेने वाहतूक पुलाच्या दोन्ही बाजूंनी दोन अरुंद रस्ते तयार करण्यात आले आहेत. या दोन्ही रस्त्यावरून विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक जण ‘शॉर्टकट’ घेण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहने चालवतात. ऑटोचालक थेट उड्डाण पुलावर चढण्याच्या ठिकाणावरूनच यू-टर्न घेतात. त्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी होते. पुलाच्या उतारावरच नाश्त्याची दुकाने पुलाच्या ‘लँडिंग’च्या अगदी बाजूलाच नाश्त्याची दुकाने आहेत. तसेच रस्त्याच्या कडेलाच पावभाजी-पाणीपुरीची दुकाने आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होते. महापालिकेचे पथक आणि वाहतूक पोलिसांचे पथक त्यांच्यावर नियमित कारवाई करण्यास हलगर्जीपणा करतात. त्यामुळे वाहनचालक रस्त्यावरील ठेलाचालकांमुळे त्रस्त आहेत. आणखी वाचा-पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली! बहिणीच्या संसारालाच सुरुंग… विमानतळाकडून मनीषनगरकडे जाताना मनात सतत भीती असते. महाजन चक्की चौकाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या ‘लँडिंग’वर पोहचताच वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. त्यासाठी बेशिस्त वाहतूक आणि पोलिसांची निष्क्रियता जबाबदार आहे. -दीक्षा अवघड (विद्यार्थिनी) या परिसरातील रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तसेच पुलाचेही निर्माणकार्य सुरू आहे. त्यामुळे उड्डाण पुलावरील वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पुरुषोत्तम बाजार चौकात तीन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच परिसरातील अतिक्रमणसुद्धा काढण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. -रितेश अहेर, पोलीस निरीक्षक, अजनी वाहतूक शाखा