अनुकूल वातावरण निर्मिती व पक्षाचा संघटनात्मक विस्तार या दोन्ही बाबी तशा एकमेकांना पूरक. राजकीय पक्ष याचाच आधार घेत मार्गक्रमण करतात. मात्र अनुकूलता कशी निर्माण करावी? त्यासाठी नेमके कोणते मुद्दे हाताळायला हवेत? लोकांची दुखरी नस पकडण्यासाठी काय करायला हवे याविषयीची अचूकता ज्याच्यावर पक्षवाढीची जबाबदारी आहे त्याला असणे आवश्यक. तीच नसेल तर काय होते हे तपासायचे असेल तर सध्याच्या काँग्रेसकडे बघायला हवे. सततचे दारुण पराभव झेलून सुद्धा हा पक्ष अजूनही चाचपडताना दिसतो. यासंदर्भातले ताजे उदाहरण या पक्षाने नागपुरात काढलेल्या यात्रेचे. हर्षवर्धन सपकाळांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या प्रथम आगमनाच्या निमित्ताने ती काढण्यात आली. अर्ध्या तासाची पायपीट व चार तासाची भाषणे असे तिचे स्वरूप. त्याला विदर्भातील झाडून सारे नेते हजर होते. नागपुरात घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व धार्मिक सलोखा वाढावा म्हणून ही यात्रा. एक कार्यक्रम म्हणून तो यशस्वी झाला असे म्हणता येईल पण यातून निर्माण झालेल्या अनुकूलतेचा लाभ पक्षवाढीसाठी होईल का? या यात्रेत मिरवणारे सारे नेते दंगलीच्या काळात नेमके कुठे होते? त्यांना बिळात लपून बसा असे निर्देश कुुणी दिले होते का? शहर काँग्रेस या काळात शांत का होती? या दंगलीत दोन्ही समुदायाचे नुकसान झाले. त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न तातडीने का झाला नाही? दंगल घडून गेल्यावर चार दिवसांनी बाहेरचे नेते येऊन सत्यशोधनाचा प्रयत्न करतात हे योग्य कसे? दंगल काळात नेते शांत बसले, त्यांनी मौन बाळगले याची शाबासकी भाजपचा एक आमदार जाहीर विधान करून देतो याचा नेमका अर्थ काय? हे सारे प्रश्न यात्रेनंतरही अनुत्तरित. सपकाळांना हे दिसत नसेल काय?
मुळात भाजपविरोधात लढायचे कसे हेच या पक्षाला अजून उमगलेले नाही. भाजपवर नुसती टीका करून पक्ष वाढणार नाही याची जाणीवच नेत्यांना झालेली नाही. राहुल गांधी संघ व भाजपवर टीका करतात मग आपणही करायची याच मानसिकतेत सारे अडकलेले. रोज घडणाऱ्या घडामोडीवरून सत्तेला प्रश्न विचारण्याचे व टीका करण्याचे काम पक्षाच्या प्रवक्त्यांचे. नेत्यांचे नाही. तरीही या पक्षातील सर्वांना प्रवक्तेपणाची भुरळ पडलेली. यामागील एकमेव कारण म्हणजे चमकोगिरी. यातून प्रसिद्धी मिळेल पण पक्ष वाढणार नाही याची जाणीव कुणाला नाही. पक्ष वाढवायचा असेल तर सामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या हाती घेऊन आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची गरज. तशी तयारी सपकाळ अजूनतरी दाखवताना दिसत नाहीत. महायुतीकडून करण्यात आलेल्या अनेक घोषणा व योजना फसव्या आहेत. या सरकारने कर्जमाफीवरून घूमजाव केले. दहा लाख लाडक्या बहिणींची केवळ पाचशेवर बोळवण केली. ओबीसींचे अनेक प्रश्न अजून मार्गीच लागलेले नाहीत. नॉनक्रिमिलेअरची मर्यादा वाढवून दिली नाही. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त. एक लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन हवेतच. यासारखे अनेक मुद्दे हाती घेत काँग्रेसला भाजपविरोधात रान उठवणे सहज शक्य. मात्र कुणीही यावर मेहनत घ्यायला तयार नाही. नागपूरच्या दंगलीला कुणाची चिथावणी कारणीभूत होती हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट. मात्र स्थानिक नेते शांत राहिले. प्रदेशस्तरावरचे नेते केवळ आरोप करत राहिले. दंगलीचा मुद्दा बाजूला ठेवला तरी या शहरात लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांची काही कमी नाही. त्यातल्या एकालाही भिडताना कुणी दिसत नाही.
हेच चित्र विदर्भातील सर्व जिल्ह्यात. अशा स्थितीत सारी जबाबदारी येऊन पडते ती सपकाळांवर. मात्र तेही प्रतिमासंवर्धनाच्या नादी लागलेले. प्रत्येक जिल्ह्यात गेल्यावर त्याच त्या निष्क्रिय नेत्यांच्या गोतावळ्यात राहून पक्ष कसा वाढणार? नवे कार्यकर्ते, नवे लोक, समाजातील विविध घटक पक्षाशी जोडले जायला हवेत यासाठी सपकाळ काहीही करताना दिसत नाहीत. हे करायचे असेल तर लोकांच्या प्रश्नाशी निगडित कार्यक्रम हवा. नेमका तोच आखला जात नाही. सध्या या पक्षात असलेले बहुतांश नेते मुंबई, दिल्लीतून कुणी आले की दिसतात. इतरवेळी ते बिळात असतात. अशा स्थितीत अशी चार तासाची यात्रा काही कामाची नाही. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरण्याशिवाय या पक्षाजवळ दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. नेमकी त्याकडे पाठ फिरवून पक्षाची वाटचाल सुरू आहे. मग पक्ष वाढणार कसा? या पक्षाची युवक काँग्रेस नेमकी कुठे आहे? महिला काँग्रेसचे नेमके काय सुरू आहे याचे उत्तर खुद्द सपकाळांनाही देता येणार नाही. अशा गलितगात्र अवस्थेत नवे लोक पक्षाशी जुळणे अशक्य. अलीकडे भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना राममंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. सोवळे व जानवे नाही म्हणून. हा सरळसरळ बहुजनांवरचा अन्याय होता. त्यावर काँग्रेसचा एकही नेता साधा व्यक्त सुद्धा झाला नाही. आयते हाती आलेले मुद्दे केवळ निष्क्रियतेमुळे सोडून देण्यात या पक्षाचा हात कुणी धरू शकत नाही. सध्या सर्वशक्तिमान व सत्तेत असलेला भाजप रोज नवे व त्यातल्या त्यात प्रतीकात्मक मुद्दे माध्यमातून समोर करत विरोधकांना अक्षरश: खेळवतो. यात फसायचे नाही याचीही जाणीव पक्षाला अजून झालेली नाही. या मुद्यावरच्या खेळात व्यस्त झाले की मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होते. तेच भाजपला हवे असते. हा ‘हेडलाईन मॅनेजमेंट’चा खेळ आहे. तो अजूनही हा पक्ष लक्षात घ्यायला तयार नाही.
या पार्श्वभूमीवर पक्षाने किमान शरद पवारांचा तरी कित्ता गिरवावा. विधानसभेत दारुण पराभव झाल्यावर पवारांचे वागणे पूर्णपणे बदलले. त्यांनी या खेळापासून स्वत:ला दूर ठेवले. माध्यमासमोर कमीत कमी येण्याचा प्रयत्न केला. जे जनतेच्या हिताचे मुद्दे आहेत त्यावरच ते बोलतात. त्यांनी भाजपवरची टीका कमी केली. सध्या ते काय करत आहेत तर नव्याने पक्षबांधणी. त्याचा फार गाजावाजा होणार नाही याची दक्षता घेत. हे सर्व डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा काँग्रेस त्यापासून बोध घ्यायला तयार नाही. सपकाळ आक्रमक आहेत. भाजप त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावू शकत नाही या जमेच्या बाजू. मात्र त्याचा फायदा घेत पक्षवाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. या पक्षाचे घोडे नेमके तिथेच पेंड खाते. सध्या या पक्षातील नेत्यांची अवस्था एकही एकर जमीन नसलेल्या जमीनदारासारखी झालेली. हे ठाऊक असूनही सारे शंभर एकराचे मालक असल्याच्या थाटात वावरतात व आपसातच भांडतात. या सर्वांना वठणीवर आणत वा येत नसतील तर बाजूला सारत समोर जाण्याची व नवे लोक जोडण्याची धमक सपकाळांना दाखवावी लागेल. त्याची तयारी सध्यातरी त्यांच्या वर्तन व दौऱ्यातून दिसत नाही. नाना व बंटीत फरक आहे हे सिद्ध करण्याची चांगली संधी सपकाळ वाया घालवत आहेत.
devendra.gawande@expressindia.com