नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. मात्र किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार हे सारेच अद्याप गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांनी कायदा व सुव्यवस्थेवरून सरकार टीका करत चहापानावर बहिष्कार टाकला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नसून अर्ज करणे हे संसदीय परंपरा नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तसेच विरोधी पक्षनेते पदाची आतापर्यंत परंपरा काय असे याबाबत माहिती दिली. ‘ईव्हीएम’च्या बळावर सत्तेत आलेले राज्यातील सरकार दलित आणि शेतकरीविरोधी आहे. परभणी येथे पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांवर अत्याचार केला जात आहे.

हेही वाचा >>> भंडारा : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नरेंद्र भोंडेकरांचा पदाचा राजीनामा

एका आंदोलकाचा पोलीस कोठडीत मृत्यू होतो. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केली जाते. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर गेली असून सरकारचे गुंडांना पाठबळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन अल्पदिवसाचे असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविभवन येथे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सरकारवर अनेक आरोप करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ नेते जितेंद्र आव्हाड, आमदार विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा >>> Maharashtra Cabinet Expansion : नागपूरला मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री, विदर्भातून सात जणांना लालदिवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधी पक्षनेते पदाची परंपरा काय?

विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करावा लागत नाही. विधानसभा अध्यक्षांनी असे म्हणणे संसदीय परंपरेला धरून नाही. सर्व विरोधी पक्षांना एकत्रित बोलावून या पदासाठी नाव मागितले जाते. हे नाव निश्चित झाल्यावर त्याची सभागृहात घोषणा होते. अध्यक्षांनी याबाबत अद्याप कुठलीच पावले उचललेली नाही. यावरून सरकार याबाबत सकारात्मक नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केली. विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीत कुठलेही मतभेत नाहीत असेही पटोले म्हणाले. या मुद्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, आतापर्यंत विरोधी पक्षनेते पदासाठी कुठलाही अर्ज आल्याचा नमुना असेल तर तो आम्हाला द्यावा. त्यानुसार आम्ही पुढची कार्यवाही करू असे सांगितले.