नागपूर : यावर्षी मोसमी पावसाचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच आहे. मात्र, २७ मे पासून मोसमी पावसाच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील.
सध्याचा अंदाज काय ?
सध्याच्या अंदाजानुसार २७ मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे आणि किमान पाच जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान पाच जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मोसमी पावसाच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो.
शेतकऱ्यांसाठी इशारा काय ?
या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मोसमी पावसापूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मोसमी पाऊस लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुसळधार पाऊस कुठे ?
दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे. येत्या ३६ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. दरम्यान, एका बाजूला पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला काही भागात शेती पिकांना देखील फटका बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे काय ?
मोसम पावसाचे आगमन वेळेच्या आधीच झाल्याची घोषणा झाली असली तरी संपूर्ण राज्य व्यापण्यास अजून बराच वेळ बाकी आहे. कारण २७ मे पासून मोसमी पावसाच्या प्रवासाची गती कमी होणार आहे. राज्याच्या बहुतांशी भागात मोसमी पाऊस दाखल होण्यास अजून बराच कालावधी बाकी आहे. साधारणपणे पाच जूनपर्यंत तरी मोसमी पाऊस संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता कमीच आहे. सध्या मोसमी पाऊस आता राज्य लवकरच व्यापणार असे सांगितले जात आहे, पण शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवून लगेच पेरणीची घाई करू नये. नाही तर नेहमीप्रमाणे नुकसान होण्याची शक्यताच अधिक आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.डॉ. अक्षय देवरस, संशोधन शास्त्रज्ञ, नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक सायन्स अँड डिपार्टमेंट ऑफ मेट्रिओऑलॉजी, रीडिंग युनिव्हर्सिटी, लंडन