वर्धा: अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन वेदनादायी असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचे येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात वास्तव्य होते. २०१७ मध्ये ते विद्यापीठातील नागार्जुन गेस्ट हाऊसमध्ये रहायला आले होते, अशी आठवण विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बुद्धदास मिरगे सांगतात. त्यांना अनेकजण भेटायला यायचे. पण लिखाणात व्यत्यय म्हणून ते भेटी टाळायचे. हलकी न्याहारी व हलकाच आहार ते घेत आणि वाचन, लिखाणात स्वतःला गुंतवून घेत. इथे असतांना त्यांनी आर्वी, यवतमाळ, गोंदिया या ठिकाणी कार्यक्रमास हजेरी लावली होती. फावल्या वेळात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना झाडावर कलम बांधण्याचे प्रशिक्षण ते देत.
विद्यापीठालगत असलेल्या निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सिजन पार्कला त्यांनी भेटी दिल्या होत्या. समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे सांगतात की या आमच्या पार्कमध्ये मारुती चितमपल्ली या नावाने एक बाग पण आहे. विविध दुर्मिळ झाडे त्यात आता वाढली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात पार्कमध्ये सलग तीन वर्ष वृक्ष लागवड करण्यात आली. त्यांना दुर्मिळ वनास्पतीचा सखोल अभ्यास होता. पेंच येथून त्यांनी नवनवीन व पारंपरिक औषधी बीज संकलित केले होते. त्याची याठिकाणी लागवड करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. आमच्या निसर्गप्रेमीच्या कुटुंबातील व्यक्तीच काळाआड गेली, अशी भावना बेलखोडे व्यक्त करतात.
विद्यापीठाचे मिरगे म्हणतात की त्यांचे सानिध्य आमच्या आठवणीचा ठेवा राहणार. मारुती चितमपल्ली हे निसर्गाचा ज्ञानकोषच होते. त्यांना १८ भाषा यायच्या. विविध चर्चेत ते ज्ञानच वाटायचे. घनदाट जंगलातील एकेक घटनेचा कार्यकारणभाव ते उलगडत. एखादी घटना जंगलात घडली की त्याचा अन्य जीवावर काय परिणाम होतो, त्यातून कशी जैव विविधता साकारते, हे ते खुलवून सांगत. जंगलातील प्रतिकूल परिस्थितीवार मात करीत हिंस्त्र पशुपासून कसे आपण संरक्षण केले, हे ते सांगायचे.
ते म्हणत वन्य प्राणी हे कधीच मनुष्यावर थेट हल्ला करीत नाही. आपण जेव्हा जंगलात असतो तेव्हा प्राण्यांना आपला वास येतो. या वासावरून प्राणी हे त्यांना धोका असल्याचे समजतात. म्हणून मग ते एक दोन किलोमीटरवरून मागोवा घेतात. आपण जंगलात मेकअप करून, सेंट व पावडर लावून जातो, हे बरे नव्हे. यामुळे प्राणी सावध होतात व स्वतःस सुरक्षित करतात. जंगल पर्यटन करतांना पर्यटकांनी कसलाच वास येणार नाही व त्यामुळे प्राणी बिथरणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे, असा चितमपल्ली यांनी सल्ला देऊन ठेवला.
ते बोलत तेव्हा ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर किती नवनवीन माहिती मिळत आहे, असे भाव दिसत. जंगलात काय करावे व करू नये याचा अभ्यास् वर्गच ते घेत. त्यांचे ज्ञानप्रचूर एकेक वाक्य म्हणजे सुभाषितच, अशी भावना मिरगे व्यक्त करतात.