भाईंदर :-भाईंदर  येथील प्लास्टिक साहित्याचा पुनर्वापर करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत कारखान्यातील साहित्य व बाजूच्या परिसरात असलेले कांदळवन जळून खाक झाले आहे. भाईंदर पश्चिम येथील मुर्धा गावातील मोकळ्या जागेत प्लास्टिक साहित्य बारीक करणारा एक कारखाना आहे. दरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास या कारखान्यात आग लागल्याची घटना घडली.यात काही क्षणातच कारखान्यातील प्लास्टिक जळू लागल्याने आगीचे रौद्ररूपात रूपांतर झाले.त्यामुळे आजूबाजूच्या परीसरात मोठी खळबळ उडाली होती. याची माहिती स्थानिकांनी मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. जवळपास ९ गाड्यामधील पाण्याचा मारा केल्यानंतर ही आग नियंत्रणात आली.यात कोणतीही जीवितहानी झाली नसून यात संपुर्ण कारखाना जळून खाक झाला असल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. या आगीच्या भडक्याने आजूबाजूच्या परिसरात प्रचंड प्रदूषण पसरले होते.

मोठा अनर्थ टळला :-

भाईंदरमध्ये प्लास्टिक कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन दल काही मिनिटाच घटना स्थळी दाखल झाले होते.यावेळी राबवलेल्या बचावकार्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.धक्कादायक बाब म्हणजे आग शांत झाल्यानंतर अग्निशमन विभागाला घटनास्थळावरून दहाहून अधिक घरगुती वापरातील सिलेंडर मिळून आले. सुदैवाने यातील एकही सिलेंडर न फुटल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगीत कांदळवन जळून खाक

भाईंदर पश्चिम येथील मुर्धा गावात खारफुटी क्षेत्रात भराव करून बेकायदेशीरपणे हा कारखाना उभारण्यात आल्याची बाब समोर आली आहे. तर या आगीत मोठ्या संख्याने कांदळवनाची झाडे जळून खाक झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या जागेची महसूल विभागाकडून देखील पाहणी करण्यात आली असून कारखानदाराविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.