नागपूर : अर्धांगवायू आणि अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिसग्रस्तांचे (एएलएस) स्नायूंवरील नियंत्रण सुटते. रुग्णांना बोलता येत नाही. अशा रुग्णांसाठी डॉ. मैत्रेयी नितीन वैरागकर यांनी डोक्यावरून मेंदूत प्रत्यारोपित करता येणाऱ्या ‘मायक्रोचीप इम्प्लांट’चे अमेरिकेत संशोधन केले.
‘एएलएस’ रुग्णांना बोलता यावे यासाठी डॉ. मैत्रेयी यांनी रुग्णाच्या मेंदूत एक ‘मायक्रोचीप इम्प्लांट चीप’ (ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस) बसवून त्याला संगणकाशी जोडले. रुग्ण बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मेंदूतील लहरी ‘चीप’मध्ये ‘कॅप्चर’ केल्या जातात, या लहरींचे ‘एआय’च्या माध्यमातून आवाजात रूपांतर होते. यापूर्वी रुग्णांच्या मेंदूतील लहरींना शब्दांत रूपांतरित करण्यात आले होते. मात्र, मेंदूतील लहरींना पहिल्यांदाच ‘आवाज’ मिळाला आहे.
सुरुवातीला याची अचूकता चार टक्केच होती. आता ती ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे ‘एएलएस’ रुग्ण नैसर्गिक आवाजात बोलण्यासह गाणेही म्हणू शकतो. अशा प्रकारेचे हे जगातील पहिलेच संशोधन असल्याचे मैत्रेयीचे वडील डॉ. नितीन वैरागकर यांनी सांगितले. डॉ. मैत्रेयी या अमेरिकेतील यूसी डेव्हिस येथे न्यूरो इंजिनीअर व प्रोजेक्ट शास्त्रज्ञ आहेत.
‘नेचर’मध्ये प्रकाशित
डॉ. मैत्रेयीचे ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेसवरील संशोधन ‘नेचर’ या प्रसिद्ध जनरलमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनाला अमेरिकेकडूनही स्वामित्व हक्क (पेटंट) देण्यात आले आहे.
रुग्णावर वापर : नवीन तंत्रज्ञान सध्यातरी एका रुग्णावर वापरले गेले आहे. ही संख्या वाढल्यास अचूकतेबाबत आणखी स्पष्टता येऊ शकेल, असे डॉ. नितीन वैरागकर यांनी सांगितले.