आ. डॉ. पंकज भोयर यांनी १७ सप्टेंबर या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते २ ऑक्टोबर, गांधी जयंतीपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे. त्यांची ही कल्पना राज्य सरकारला भावली असून शासनाने हा उपक्रम राज्यभरात राबवण्याची घोषणा केली आहे.

राज्य शासनाने ‘ सेवा पंधरवडा ‘ या उपक्रमाची घोषणा केली आहे. त्याचा आधार आमदार डॉ. पंकज भोयर यांचाच उपक्रम असल्याची बाब उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या पत्रातून अधोरेखित होत आहे. आ. भोयर यांनी मांडलेली कल्पना राज्य पातळीवर आता अंमलात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून म्हणजेच १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबर, गांधी जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा उपक्रम राज्यभर राबवण्याचा निर्णय सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर माध्यमांना दिली.

हेही वाचा : नागपूर : मध्य भारतातील एकमात्र शासकीय केंद्रात पिवळ्या तापाच्या केवळ १० लस मात्रा उपलब्ध!

मात्र, यापूर्वीच असा उपक्रम जिल्हा पातळीवर घेण्याचे ठरवून आ. भोयर व चमू कामाला लागली. तसे पत्र त्यांनी २६ ऑगस्टला उपमुख्यमंत्री यांना निमंत्रित करताना दिले. त्यावर १३ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री कार्यालयातील खासगी सचिवांनी उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी ही संकल्पना राज्यभर राबवून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अंमलात आणण्याचे ठरवले आहे. मुख्य सचिवांनी तसे पत्र दिल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले. तसेच जनकल्याणाची सकारात्मक सूचना सुचवल्याबद्दल आ. डॉ. भोयर यांना धन्यवाद दिले आहे. आ. डॉ भोयर यांनी हा उपक्रम राज्यभर राबवण्याचा निर्णय स्तुत्य असून त्याबद्दल उपमुख्यमंत्र्याचे आभार मानले आहे. या काळात विविध शासकीय योजनांचा लाभ गरजूंना देण्याचा प्रयत्न केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.