* गोसीखुर्द धरणाचे प्रदूषण
* भंडारा, तुमसर, पवनी, कन्हान, कामठी नगरपरिषदांनाही निर्देश
कन्हान, वैनगंगा नदी आणि गोसीखुर्द धरणातील पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून ते कार्यान्वित करण्यासाठी नागपूर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) यांना कालमर्यादा घालून दिली आहे. त्याशिवाय उच्च न्यायालयाने भंडारा, तुमसर, पवनी, कन्हान, कामठी नगरपरिषदांसह कामठी कॅन्टॉनमेंट बोर्ड आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळालाही अनेक निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कालमर्यादेमुळे कन्हान, वैनगंगा नद्या आणि गोसीखुर्द प्रकल्पांतील पाण्याचे प्रदूषण रोखता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूर शहरातील सांडपाणी नाग नदी आणि पिवळी नदीच्या माध्यमातून गोसीखुर्द धरणात सोडल्या जात आहे. ग्रामीण भागातील लोकांना या दूषित पाण्यामुळे त्वचारोग आणि इतर आजार झाले आहेत. याकडे लक्ष वेधणारी याचिका धार्मिक फाऊंडेशनने दाखल केली. नाग नदीतील पाण्यामुळे गोसीखुर्दचे पाणी दूषित होत असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्याची उच्च न्यायालयाने दखल घेत जनहित याचिका दाखल केली होती.
या दोन्ही याचिकेवर गुरुवारी एकत्रित सुनावणी झाली. शहरातील मलवाहिन्या नाग नदी आणि पिवळ्या नदीला जोडण्यात आल्या आहेत. ही सर्व घाण पुढे कन्हान नदीद्वारे गोसीखुर्द धरणात जाते. या नदीच्या काठावरील गावांतील नागरिकांना दूषित पाण्यामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. एकीकडे शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाणी, असे चित्र आहे. हे न्यायसंगत नाही. सर्वाना पिण्यायोग्य पाणी मिळणे घटनात्मक अधिकार आहे, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. आज या याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने विविध संस्थेला अनेक निर्देश दिले.
संस्थेनिहाय उच्च न्यायालयाचे निर्देश
* नागपूर महापालिकेने भांडेवाडी येथील महाजनकोद्वारे उभारण्यात येणारे १३० एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) ३१ डिसेंबपर्यंत कार्यान्वित करावे. त्यामुळे नाग नदीतून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर होईल आणि चांगले पाणी नदीच्या पात्रात जाईल.
* महापालिकेने २०१७ पर्यंत १०० एमएलडी क्षमतेच्या एसटीपींची क्षमता वाढवून २०० एमएलडी करावी.
* नासुप्रने जून-१६ पर्यंत कमी क्षमतेची पाच एसटीपी प्रकल्प विविध वसाहतीमध्ये निर्माण करण्याच्या कामास सुरुवात करावी आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
* कामठी कॅन्टॉनमेंट बोर्डने ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत स्वत:चा एसटीपी प्रकल्प कार्यान्वित करावा.
* वैनगंगा नदीमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या भंडारा, तुमसर नगरपरिषदांनी ३१ मार्च, २०१६ पर्यंत राज्य सरकारकडे एसटीपीकरिता प्रस्ताव सादर करावा आणि राज्याच्या नगरविकास विभागाने जून-२०१६ पर्यंत त्यावर निर्णय घ्यावा.
* कन्हान नदीत सांडपाणी सोडणाऱ्या कामठी, कन्हान-पिंपरी आणि वैनगंगा नदीवरील पवनी नगरपरिषदांना याचिकेत नवीन प्रतिवादी करून त्यांना नोटीस बजावण्यात आली. उच्च न्यायालयाने त्यांना सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात दोन आठवडय़ात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.
* गोसीखुर्द धरणामध्ये जमा होणारी घाण आणि कचरा स्वच्छ करण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन आठवडय़ात उपाय सुचवावे, असे उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे.