नागपूर : दहावीची परीक्षा उत्तीर्ण होताच पालकांना त्यांच्या पाल्यांसाठी ‘जेईई’ आणि ‘नीट’ हे दोनच पर्याय दिसतात. कारण, शिकवणी वर्गांनी तसेच चित्र निर्माण केलेले असते. मात्र, वास्तव यापेक्षा खूप वेगळे आहे. जेईई परीक्षा देणाऱ्या १० लाख विद्यार्थ्यांमधून ८ लाख ३३ हजार विद्यार्थी ३०० पैकी ५० गुणही घेऊ शकत नाहीत तर ‘नीट’ देणाऱ्यांची अवस्था यापेक्षा बिकट असते. त्यामुळे पालकांनी शिकवणी वर्गांच्या मायाजाळात अडकून जेईई, नीटच्या मागे न धावता अन्य पर्यायांचाही शोध घ्यावा, असा सल्ला करिअर समुपदेशक प्रा. पाणिनी तेलंग यांनी दिला.
राज्य मंडळ आणि सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर होताच पुढील प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. पाणिनी तेलंग यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट देत करिअरच्या नवीन संधींविषयी माहिती दिली. ते म्हणाले, दहावी झाल्यावर ३६ प्रकारच्या विविध प्रवेश पूर्व परीक्षा आहेत. याशिवाय महाविद्यालय आणि शिकवणी वर्गांच्या मिळून जवळपास दोनशे परीक्षा व सोबतच अकरावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात. अशा शैक्षणिक पद्धतीमुळे आपण फक्त परीक्षार्थी तयार करत आहोत. त्यांना विचार करायलाच वेळ नाही. १११ शाखांमध्ये अभियांत्रिकी करता येते. परंतु, आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि अन्य चार शाखांचीच माहिती असते. आयआयटीच्या १६ हजार जागांसाठी दहा लाखांवर विद्यार्थी परीक्षा देतात.
मात्र, आयआयटीमधून बाहेर पडणाऱ्यांना किमान ११ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची नोकरी मिळते हे वास्तव आहे. दरवर्षी २० लाख विद्यार्थी ‘नीट’ची परीक्षा देत असून त्याद्वारे महाराष्ट्रातून केवळ १.८९ टक्केच मुलांना प्रवेश मिळतो. मात्र, हे खरे चित्र कुठलेच शिकवणीवाले सांगत नाहीत आणि पालकही याबाबत अभ्यास करत नाहीत. सगळे करतात म्हणून मुलांना या घोळक्यात पाठवले जाते. परंतु, आपल्या मुलाला खरच वाचनाची आवड आहे का?, तो इतका अभ्यास करू शकेल का? हे आधी समजून घ्यायला हवे. त्यामुळे शिकवणी वर्गांच्या देखाव्याला बळी न पडता करिअरच्या अन्य पर्यायांचा विचार करा, असे आवाहन प्रा. तेलंग यांनी केले.
कुठल्या गोष्टींवर लक्ष द्याल?
करिअरची निवड करताना सर्वात आधी ‘दृष्टिकोन’ स्पष्ट हवा. आपण ज्या क्षेत्राची निवड करणार आहोत त्याचे पुढील दहा वर्षातील चित्र काय असेल, सरकार कुठल्या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक करते, याचा विचार करून निवड क्षेत्राची करावी. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ‘वेगळेपणा’. करिअर निवडताना ते परंपरेपेक्षा वेगळे असेल तरच तुम्हाला प्रसिद्धी आणि पैसा मिळेल. तिसरे म्हणजे समाजाला किंवा देशाला आपण जे शिकवतो त्याची ‘गरज काय’ यावर विचार व्हायला हवा. चौथा मुद्दा ‘आवड आणि आकर्षण’. आवड सतत बदलत असेल तर ते आकर्षण आहे. त्यामुळे करिअर निवडताना याकडे लक्ष द्यावे. याशिवाय पालकांनी सुचवलेल्या क्षेत्रातही यशस्वी होता येते. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊंप्रमाणे पालकांना मुलांचे करिअर घडवता यायला हवे, याकडे तेलंग यांनी लक्ष वेधले.
‘सीबीएसई’ की राज्य मंडळ?
दहावी झाल्यावर कुठल्या शिक्षण मंडळात प्रवेश घ्यावा हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो. परंतु, तुम्हाला जर जेईई, नीट, आयजर, नायजर या परीक्षा द्यायच्या असतील तर सीबीएसईमध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे. कारण, याचा अभ्यासक्रम या परीक्षांसाठी योग्य आहे. सीबीएसईमध्ये सर्वाधिक अप्लिकेशन आधारित अभ्यासक्रम असतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रमातील एनसीईआरटीच्या पुस्तकांचा फायदा होतो, असेही प्रा. तेलंग म्हणाले.