नागपूर : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावे. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. तसेच जनसंवाद कार्यक्रमात बदल्यांची निवेदने स्वीकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे रविवारी बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम झाला. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांना २५६ टोकन वितरित करण्यात आली. जनसंवाद हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आहे. त्यामुळे बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवावेत, असे बावनकुळे यावेळी म्हणाले. प्रामुख्याने सांडपाणी, वीज, पाणी, रस्ते कामांची निवेदने पाहायला मिळाली. यात नगरपंचायत, नगरपरिषद, ग्राम स्तरावरील कामांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसून आले.
नागरिकांची शासनाकडे प्रलंबित व नियमानुसार करता येणारी कामे दिरंगाई न करता तातडीने पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी शासकीय विभागांना दिले. सर्व निवेदने, समस्या व इतर प्रकरणांविषयी संबंधित विभागाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असेही बावनकुळे यांनी यावेळी निर्देश दिले.