नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार असताना युवा स्वाभिमानी पक्षाच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईत मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली होती. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. परंतु हे दाम्पत्य हनुमान चालिसा पठणावर कायम राहिल्यावर त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यावर प्रतिक्रिया देताना तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हल्ला करू, आंदोलन करू असे काहीही म्हटले नव्हते.

हेही वाचा >>> महापालिका निवडणूक लांबल्‍याने इच्‍छुकांमध्‍ये अस्‍वस्‍थता

फक्त हनुमान चालिसा म्हणणार हेच सांगितले होते. हनुमान चालिसा महाराष्ट्रात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानात म्हणायची का?’ असाही प्रश्न केला होता. फडणवीसांच्या त्यावेळच्या वक्तव्याची आठवण  ‘युवा : परिवर्तन की आवाज’ वर्धाचे अध्यक्ष निहाल पांडे यांनी सोमवारी त्यांच्या आंदोलनाच्यावेळी करून दिली. ते  म्हणाले की, आम्ही फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवास्थानाजवळ शांततेत हनुमान चालिसा पठण करणार होतो. आम्हाला तेथे जाण्यापासून पोलिसांनी  अडवले . हे योग्य नाही. आम्ही पाकिस्तानात जाऊन हनुमान चालिसा पठण करायचे काय? असा संतप्त प्रश्न त्यांनी फडणवीस यांना केला.

हेही वाचा >>> शेगावात लाखावर भाविकांची मांदियाळी; अकराशे दिंड्याही दाखल; माध्यान्ही दर्शनाला लागताहेत पाच तास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनउन्नती अभियान, वर्धा अंतर्गत प्रभाग संघ व्यवस्थापक पदावरील महिलांच्या थकीत वेतनाच्या मागणीसाठी नागपुरातील देवेंद्र फडणवीसांच्या धरमपेठ येथील निवासस्थानापुढे हनुमान चालिसा पठण केले जाणार होते. पोलिसांनी आंदोलकांना तेथे जाण्यापासून रोखले. त्यावर पांडे प्रतिक्रिया देत होते. दरम्यान, नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी आमच्या शिष्टमंडळाला बोलावले होते. यावेळी मंगळवारी वर्धेत बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु याहीवेळी सकारात्मक निर्णय न झाल्यास छुप्या पद्धतीने फडणवीस यांच्या घराजवळ जाऊन हनुमान चालिसा वाचण्याचा इशाराही त्यांनी दिला. नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याने फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या शेजारी शांततेत हे आंदोलन करणार असल्याचाही दावा त्यांनी केला.