नागपूर : वाढत्या तापमानामुळे गणपती बाप्पा आणि भाविक यांच्यात अडथळा येऊ नये आणि गणपती बाप्पा भाविकांच्या भक्तीसाठी दुरावू नये याकरिता मंदिर प्रशासनाने अनोखी शक्कल लढवली आहे. त्यामुळे बाप्पा आणि भाविक यांच्यातील भक्तीचा ओलावा तसाच कायम आहे. नागपुरातील गणेश टेकडी मंदिर अतिशय प्राचीन असून मूर्ती स्वयंभू आहे. या स्वयंभू गणपर्तीच्या दर्शनसाठी दररोजच भाविक येत असतात. पूर्वीच्या काळात भोसले राजघराण्यातील मंडळी येथे नियमित दर्शनाला येत होते. टेकडी गणपतीचा ३५० वर्षे जुना इतिहास आहे.

विदर्भातील अष्टविनायकांमध्ये पहिला मान टेकडी गणपतीला आहे. सिताबर्डीच्या टेकडीवर हे मंदिर असल्याने त्याला टेकडी गणेश मंदिर असे म्हटले जाते. १८१८ साली नागपुरचे राजे आप्पासाहेब भोसले यांच्या नेतृत्त्वातील मराठा-ब्रिटीश युद्धात आप्पासाहेबांचा पराभव झाला आणि त्यानंतर इंग्रजांनी सिताबर्डी किल्ल्यावर ताबा मिळवला. टेकडीचा पूर्व भाग सुरूंग लावून पाडत असताना श्री गणेशाची मूर्ती दृष्टीस पडली.

पिंपळाच्या झाडाखाली ती प्रकट झाली आणि अजूनही ती तिथेच आहे. भाविकांच्या अपार श्रद्धेतून या मंदिराचा जिर्णोद्धार झाला. नागपुरकरांचे आराध्य दैवत असलेल्या या बाप्पाबद्दल नागपूरकरांच्या मनात अपार श्रद्धा आहे. त्यामुळेच या मंदिरात येणाऱ्या भाविकांची विशेष काळजी घेतली जात आहे. वाढत्या तापमानामुळे आणि उष्णतेच्या परिस्थितीमुळे, मंदिर अधिकाऱ्यांनी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विचारपूर्वक उपाययोजना केल्या आहेत. मंदिर परिसरात सावलीचे तंबू, पाण्याचे स्टेशन आणि पंखे यासारख्या थंड व्यवस्था बसवण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक वृद्ध आणि इतर भाविकांना उष्णतेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी मदत करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिकांनी या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात स्पिंकलर लावण्यात येत आहेत. जेणेकरुन बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्याचा त्रास होऊ नये. काही वर्षांपूर्वी थंडीच्या मोसमात तात्या टोपे नगरातील गणेश मंदिरात थंडीपासून बचावासाठी गणपती बाप्पाच्या मुर्तीला गरम कपडे घालण्यात आले. त्यांच्या मुर्तीवर शाल ओढण्यात आली. गाभाऱ्यात हिटर लावण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकार नागपूर शहरात चर्चेचा ठरला होता. मात्र, टेकडी गणेश मंदिरात गणपती बाप्पाला उन्हाचे चटके बसू नये आणि त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून मंदिराचा संपूर्ण परिसरच गारेगार करण्यात आला.