भाजप मोठ्या प्रमाणात चुका करत आहे. मात्र, त्या चुकाही चांगल्या आणि बरोबर आहेत हे सांगण्यात भाजप पटाईत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘बेटी बचाव बेटी पटावो’ म्हटले आहे. हे वाक्य जर काँग्रेसच्या नेत्याने म्हटले असते तर त्यांचे जगणे कठीण केले असते. या वक्तव्यातून महिलांबद्दलच्या भाजपच्या कलूषित भावना निदर्शनास येतात. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, ते फक्त भाजपचे पंतप्रधान आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे केली.

हेही वाचा >>>चंद्रपूर : घरी न सांगता पोहायला जाण्याचा बेत जीवावर बेतला, इरई नदीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू

काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी बेटी बचाव बेटी पढाओ’ असे म्हणण्याऐवजी ‘बेटी पटावो’ असा उल्लेख मागे केला होता. आम्ही त्यावर वादळ निर्माण करू शकलो नाही, पण अशा वक्तव्यातून महिलांबद्दल, मुलींबद्दल भाजपची भावना कशाप्रकारची आहे, हे दिसून येते.
गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी एका वाहनात कोंबून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आदिवासी मुलांची अशाप्रकारे जनावरांसारखी वाहतूक करणे हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिला नाही. या ‘ईडी’ सरकारला जनतेचे काही देणे घेणे नाही. या संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. राज्याला लुटण्याचे काम होत असून ते थांबले पाहिजे, असे पटोले म्हणाले.

हेही वाचा >>> आश्रम शाळेतील १२० विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमध्ये कोंबले; श्वास गुदमरल्याने प्रकृती खालावली

पद जाणार असल्याने पटोले भयग्रस्त – चौधरी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पद जाणार असल्यामुळे ते स्वतःच भयग्रस्त झाले असून आपले पद वाचवण्यासाठी वैफल्यग्रस्तेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणे हा त्यांचा नाईलाज आहे, अशा शब्दात भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. पंतप्रधानपद हे देशाचे असते याचे भान पटोले यांच्यासारख्या नेत्याला नाही. आपल्या भाषणात पंतप्रधानांचा एकेरी भाषेत त्यांनी उल्लेख केला, याचा निषेध भाजपाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केला, असे चौधरी यांनी सांगितले. यापुढे पटोले यांनी तोंड सांभाळून बोलावे अन्यथा भाजप त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही चौधरी यांनी दिला आहे.