सुमित पाकलवार

गडचिरोली : देशात वन्यप्राण्यांच्या शिकारीवर भारत सरकारने १९७२ मध्ये बंदी घातली. तेव्हापर्यंत देशात शिकार पर्यटन हा व्यवसाय अस्तित्वात होता. त्यात वाघाच्या शिकारीसाठी विदेशातून पर्यटक यायचे. मध्य भारतात असेच एक ठिकाण प्रसिद्ध होते ते म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील ‘पोर्ला इस्टेट’. येथील ‘नवाब’ कुटुंबीय या शिकारीचे आयोजन करायचे. यासाठी नवाब युसुफ अली नावाने कंपनी कार्यरत होती. विस्मृतीत गेलेला हा ऐतिहासिक ठेवा संग्रहालयाच्या रूपाने नवरगाव येथे पुन्हा आकार घेतोय.

मागील पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात मानव व वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहोचला आहे. वाढलेल्या वाघाच्या हल्यात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. यात पोर्ला वनपरिक्षेत्र सर्वाधिक प्रभावित क्षेत्र आहे. मात्र, यापूर्वी या परिसरात वाघ नव्हते असे अनेकजण सांगतात.  परंतु ५० वर्षांपूर्वी हा परिसर वाघाच्या शिकारीचे पर्यटनस्थळ होते. येथे वास्तव्यास असलेले नवाब  युसुफ अली हे शिकारीचे आयोजन करीत होते. अनेक देशांतून येथे पर्यटक यायचे. या व्यवसायामुळे एकेकाळी या भागाला मोठे वैभव प्राप्त झाले होते. परंतु काही निवडक लोकांना वगळल्यास याबद्दल फारसे कुणाला माहिती नाही. त्याच नवाब कुटुंबातील सदस्य मीर आरिफ अली आजारी असूनही या ऐतिहासिक माहितीचा ठेवा जपण्यासाठी धडपडत आहे. त्यांच्याशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला.

हेही वाचा >>> नागपूर : ३० ट्रकचा मालक, करोनात डबघाईस आला, नुकसान भरून काढण्यासाठी…

ते याबद्दल भरभरून बोलतात, जवळपास २०० वर्षांपूर्वी राजे भोसले यांनी लढाईत बांदा नवाबला मात दिली. यात त्यांना साथ देणाऱ्या मीर बक्षी अली यांना वैरागड येथे भोसले यांनी जमीन देत नवाब पदवी बहाल केली. तेव्हापासून हे कुटुंब या परिसरात वास्तव्यास आहे. त्यांनी एक एक करून जवळपासच्या २४ गावांची वतनदारी मिळविली. यामुळे त्यांची ‘पोर्ला इस्टेट’चे नवाब म्हणून ओळख निर्माण झाली. कोणताही भेदभाव न करता न्यायनिवाडा करणे. शेती आणि पाण्याचे योग्य नियोजन करून आपल्या भागातील जीवनमान कसे सुसह्य होईल याकडे त्यांनी कायम लक्ष दिले. दरम्यानच्या काळात या परिसरात वाघाच्या शिकारीसाठी पर्यटक येऊ लागले. त्यावेळेस यावर बंदी नव्हती.

हेही वाचा >>> घृणास्पद! स्वत:च्या दोन मुलींवर बापाचा अत्याचार; नराधमाला दुहेरी जन्मठेप

नवाब बक्षी यांचे पणतू मीर युसूफ अली हे यात पारंगत होते. १९३४ ते १९५४ पर्यंत या व्यवसायाची मोठी भरभराट झाली. त्याकाळी देशात एकूण २१ कंपनी कार्यरत होत्या. त्यापैकी युसुफ अली ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर होती. पुढे १९७० पर्यंत त्यांचा हा व्यवसाय चालू होता. असे मीर आरिफ अली यांनी सांगितले. नवाब कुटुंबातील सदस्य व्यवसायानिमित्त नागपूर आणि दुबई येथे वास्तव्यास आहे. आरिफ अली यांनी त्याकाळी दोन अभियांत्रिकी पदव्या घेतल्या आहेत. त्यांची सातवेळा शस्त्रक्रिया झाली असल्याने शेवटचा काळ पोर्ला येथे घालवायचा असल्याचे ते सांगतात. या व्यवसायाची नोंद वन विभागाच्या दफ्तरी देखील आहे. हा सगळा ऐतिहासिक दस्तावेज गोळा करून त्याचे संग्रहालय नवरगाव येथे उभारण्यात येत आहे. याबद्दल एक पुस्तक देखील मोटार वाहन निरीक्षक योगेंद्र मोडक लिहीत आहे. ते आंतरराष्ट्रीय काष्ठ शिल्पकार आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : गृहनिर्माण प्रकल्पाची कागदपत्रे आता संकेतस्थळावर, नागरिकांची फसवणूक टाळणार

वन व वन्यप्राणी संवर्धनावर भर

वाघाची शिकार आयोजित करणारे युसुफ अली याकडे केवळ व्यवसाय म्हणून बघायचे. जंगल आणि वन्यप्राणी संवर्धनाकडे त्यांचे विशेष लक्ष होते. म्हणूनच शिकारीसाठी ते केवळ नर प्राण्याची निवड करायचे. पायाच्या ठशावरून ते वघाची ओळख पटवायचे. त्यामुळे जंगलात ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करणे. त्यांच्या अन्नाची व्यवस्था करणे. हेही ते आवर्जून करायचे. मध्य भारतातील दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध भागात या शिकारीचे आयोजन करण्यात येत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षात ११ शिकार, ३ कोटींचे विदेशी चलन

या भागातील शिकार पर्यटनातून सरकारच्या तिजोरीत ३ कोटींचे विदेशी चलन आले. एका शिकारीसाठी युसुफ अली १.५० लक्ष आकारत होते. प्रामुख्याने अमेरिका, डेन्मार्क, जर्मनी आणि युरोप भागातील पर्यटक याठिकाणी भेट देत होते. शिकारीसाठी एका चमूला आठ दिवसांचा कालावधी देण्यात येत होता. १९७२ साली जेव्हा शिकारीवर बंदी आली. तेव्हा पुढील पंधरा वर्षाचे ‘ ‘अडवान्स बुकिंग’ होते. यामुळे त्या सर्वांना पैसे परत करावे लागल्याचे मीर आरिफ आली सांगतात