गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी नक्षल नेता गिरीधर याने पत्नीसह आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादी चळवळीला हादरा बसल्याचे बोलल्या जात असताना गडचिरोलीतील आणखी पाच गावांनी नक्षलवाद्यांना प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे आधीच पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानामुळे शेवटची घटका मोजत असलेल्या या चळवळीची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र आहे.

नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. २००३ पासून नक्षल गावबंदी योजना सुरू आहे. या योजनेच्या अनुषंगाने पोलीस दलामार्फत जनजागृती सुरू आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन हिंसक चळवळीकडे भरकटलेल्यांना पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आत्मसमर्पण योजनाही आहे. दरम्यान, २४ जून रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलीस ठाणे हद्दीतील मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपणार व मुरुंगल या पाच गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन नक्षल्यांना गावबंदी करून त्याबाबतचा ठराव पोलिसांना सादर केला. पाचही गावे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा­ऱ्या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये नक्षलवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा नक्षलवाद्यांना पाठिंबा होता. मात्र, आता लोकांमध्ये परिवर्तन होत असून हिंसक चळवळीला नकार देण्याची हिंमत दाखविली जात आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी २०० भरमार बंदुका व सळ्या व स्फोटक वस्तूही पोलिसांकडे सोपविल्या आहेत. उपअधीक्षक अमर मोहिते, लाहेरी येथील प्रभारी अधिकारी संतोष काजळे, उपनिरीक्षक प्रशांत डगवार, सचिन सरकटे, आकाश पुयड व धोडराज येथील प्रभारी अधिकारी शरद काकळीज, उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी यांनी यासाठी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा – मुंबईच्या जोगेश्वरीतून सायबर लुटारूंची आंतरराज्यीय टोळी जेरबंद, नऊ आरोपींचा समावेश

१० दिवसांत १३ गावांनी केली प्रवेशबंदी

१४ जूनला भामरागड उपविभागांतर्गत धोडराज पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात गावांतील नागरिकांनी नक्षल्यांना गावबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भटपार गावक­ऱ्यांनीही नक्षल्यांविरुद्ध उठाव केला. आता आणखी पाच गावांनी निर्धार केल्याने दहा दिवसांत १३ गावांनी नक्षल्यांना प्रवेशबंदी केली आहे.

हेही वाचा – नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरींची चौकशी सुरूच राहणार; न्यायालयाचा अंतरिम स्थगिती देण्यास…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नक्षल्यांची दुहेरी कोंडी

दरम्यान, २२ जूनला जहाल नक्षल नेता गिरीधर तुमरेटी ऊर्फ गिरीधर व त्याची पत्नी संगीता या दाम्पत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. त्यानंतर दुसरीकडे बालेकिल्ल्यातच माओवाद्यांविरुद्ध उठाव सुरू केला आहे. त्यामुळे माओवाद्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुहेरी कोंडीमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.