यवतमाळ येथील बहुचर्चित शिक्षक पती हत्याकांडातील आरोपी पत्नी मुख्याध्यापिकेची शैक्षणिक अर्हता नसतानाही या पदावर तिची नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक बाब तपासात पुढे आली. त्यामुळे अर्हताधारकांना डावलून आरोपी निधी शंतनू देशमुख हिच्यावर संस्था का मेहेरबान झाली, हा शोधाचा विषय झाला आहे.
यवतमाळ शहरालगत लोहारा येथील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक असलेल्या शंतनू अरविंद देशमुख यांची १३ मे रोजी याच शाळेत मुख्याध्यापिका असलेली पत्नी निधी शंतनू देशमुख हिने विष देऊन हत्या केली. हत्येनंतर शाळेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने तिने पतीचा मृतदेह चौसाळा जंगलात फेकून दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटनास्थळी जाऊन मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा मृतदेह आढळल्यानंतर त्याची ओळख न पटल्याने पोलिसांनी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणाची चौकशी करत असताना शंतनू चार, पाच दिवसांपासून बेपत्ता आहे, मात्र त्याची कुठेही तक्रार नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसाने शंतनूचे मित्र आणि पत्नीची चौकशी केली. तेव्हा निधीने पतीला विष देऊन हत्या केल्याची कबुली दिली आणि या हत्याकांडाचा उलगडा झाला.
मुख्याध्यापिकेने स्वतःच्याच शाळेत शिक्षक असलेल्या पतीची विष देऊन हत्या केल्याच्या घटनेला या दोघांमधील पदांच्या वर्चस्वाची किनार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ यापूर्वीच दिले होते. पोलिसांनी या अंगाने चौकशी केल्यानंतर निधीची शैक्षणिक पात्रता नसतानाही तिला संस्थेने मुख्याध्यापकपदी नियुक्ती दिल्याची बाब उघड झाली. लोहारा पोलिसांनी बुधवारी या इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थाचालकास चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. तेव्हा शिक्षक शंतनू देशमुख हत्याकांडाची मास्टरमाइंड निधी देशमुख हिची या शाळेतील मुख्याध्यापिकापदाची नियुक्ती वादाचा विषय असल्याचे समोर आले. निधीचे पदवीपर्यंचेही शिक्षण पूर्ण झाले नाही. तिचे बीएससी द्वितीय वर्गापर्यंतच शिक्षण झाले असताना संस्था चालकाने मुख्याध्यापिका पदावर तिला पात्र कसे ठरविले, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सदर शाळेत दहावीर्यत शिक्षण दिले जाते. त्यामुळे माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमानुसार शाळेत एमए, बीएड पदवीप्राप्त मुख्याध्यापक असणे आवश्यक आहे. परंतु, पात्रता नसताना ही महिला मुख्याध्यापिका पदावर कार्यरत होती. शिक्षक पतीच्या हंत्याकांडामुळे निधीची ही बेकायदेशीर नियुक्ती चर्चेत आली आहे.
पालकांनी शाळेतून मुलांची नावे काढली
या हत्याकांडामुळे शिक्षकवर्गासह पालकवर्गही हादरून गेला आहे. मुख्याध्यापिकेने शाळेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा या हत्याकांडात वापर केल्याने, पालकवर्ग संताप व्यक्त करत आहे. ही शाळा यापूर्वीही वादग्रस्त ठरली आहे. मात्र या हत्याकांडामुळे संतप्त पालकांनी दोन दिवसांपूवी शाळेत मुलांची टीसी काढण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी पालक आणि शाळा व्यवस्थापनात वादही झाला. मात्र अनेक पालकांनी मुलांची नावं या काढल्याची माहिती मिळाली आहे.