लोकसत्ता टीम
नागपूर: शिक्षणाबरोबर आर्थिक सामाजिक परिस्थितीचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होत असतो. लहान मुले आई-बाबा कसे वागतात, कसे बोलतात, काय खातात, काय पितात याचे अनेक अंगांनी सूक्ष्म निरीक्षण करीत असतात. त्याचाही परिणाम मुलांच्या मानसिक अवस्थेवर होत असतो, असे प्रतिपादन मेयो रुग्णालयाचे मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेख सोमाणी यांनी व्यक्त केले.
सायकियाट्रिक सोसायटी, नागपूर आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दैनंदिन समस्यांचे मानसशास्त्रीय आधार या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. डॉ. सोमाणी यांचा विषय मुलांच्या यशात पालकांची भूमिका हा होता. डॉ. सोमाणी पुढे म्हणाले, लहान बालके घरामध्ये सुरू असलेल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात, पण घरच्या मोठ्या मंडळींना वाटते की, हे तर छोटेसे बाळ आहे, याच्या काय लक्षात येणार! पण चूक इथेच होते. मुलांना लहान समजण्याची खूप मोठी चूक मोठी माणसे करतात. त्याचा मुलांच्या भावविश्वावर खोलवर परिणाम होत असतो.
आणखी वाचा-५०० मुले एकाचवेळी पोहतील! काय आहे हा प्रकल्प…
दरम्यान मुलाला आपण घरात एखाद गोष्ट करू नको म्हटले तर पालकांनीही ही गोष्ट टाळायला हवी. अन्यथा मुलाला त्याला वेगळा व पालकांना वेगळा नियम असल्याचे वाटते. सोबत मुलांना कठोर शिक्षा नकोच. त्यांना घरात सुरक्षित वाटायला हवे. घरात काहीही केले तर त्याच्यासोबत वाईट होणार नाही, असे त्याला वाटायला हवे. मुलाला शिक्षाच करायची असल्यास त्यातून त्याला शारिरिक त्रास होणार नाही. सोबत तुर्तास काही वाईट वाटले, तरी पुढे त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळेल, अशी हवी, असेही डॉ. सोमाणी म्हणाले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सायकियाट्रिक सोसायटीच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. निखील पांडे, सचिव डॉ. अभिषेक मामर्डे प्रयत्न केले.