केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नितीन गडकरी यांच्या निवडणुकीतील विजयाला प्रतिस्पर्धी उमेदवार नाना पटोले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारा आव्हान दिले आहे. गडकरी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली व अवैध पद्धतीने निवडून आल्याचा दावा पटोले यांनी केला असून गडकरी यांची निवडणूक रद्द ठरवून आपल्याला विजयी करण्याची मागणीही पटोले यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाने ११ मार्च २०१९ ला लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात नागपुरात निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीसाठी गडकरी यांनी २५ मार्चला उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत जोडण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात गडकरींनी चुकीची माहिती सादर केली. त्यांनी आपल्या उत्पन्नाचा स्रोत शेती दाखवला आहे. पण, त्यांच्या नावावर एकही शेतजमीन नाही. दुसरीकडे प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या वडिलांचे नाव चुकीचे लिहिले आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपले उत्पन्न जाणीवपूर्वक कमी दाखवले आहे. त्यांनी चुकीची माहिती दर्शवून मतदारांमध्ये गैरसमज निर्माण केला व निवडणूक जिंकली. त्यानुसार वैध मतांचा विचार केल्यास आपणच निवडणूक जिंकलो असून गडकरींची निवड रद्द ठरवण्यात यावी आणि आपल्याला विजयी घोषित करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका नाना पटोले व सुरेश हेडाऊ यांनी दाखल केली. या याचिकेवर लवकरच उच्च न्यायालयात सुनावणी होईल. नाना पटोले यांच्यावतीने अ‍ॅड. वैभव जगताप हे काम पाहात आहेत.

गजभियेंचेही रामटेकच्या निवडणुकीला आव्हान

नाना पटोले यांच्यासोबतच किशोर गजभिये यांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांनी रामटेक लोकसभा निवडणूक अवैध ठरवण्याची विनंती केली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात सदोष ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. निवडणुकीवेळी मॉक मतदान करतानाही ईव्हीएम सदोष असल्याचा आक्षेप घेतला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्याशिवाय उमरेड येथील तात्पुरत्या स्ट्राँग रुममधून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चलचित्र साठवणारे डीव्हीआर आणि टीव्ही संच चोरीला गेला होता. त्या प्रकरणी अनेक दिवस गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.  एकंदर रामटेक लोकसभा मतदारसंघात राबवण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया अवैध असून ती रद्द करण्याची विनंती गजभिये यांनी केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे हे काम पाहात आहेत.