नागपूर : स्त्रियांना शिक्षणाचे द्वार खुले करणारे थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपटाला नागपुरात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित ‘फुले’ चित्रपटांच्या ‘विशेष शो’चे नागपुरातील सदर येथील बुटी (स्मृती)चित्रपटगृहात सोमवारी आयोजन करण्यात आले.

ब्राह्मण महासंघाने या चित्रपटास आक्षेप घेतला होता. चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो, अशी शक्यतादेखील महासंघाने वर्तवली होती. ब्राह्मण रक्षा मंच ही संघटना या चित्रपटाला सर्वाधिक विरोध करत आहे. या चित्रपटात ब्राह्मणांची प्रतिमा मलिन केल्याचा आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केल्याचा आरोप संघटनेने केला होता. ‘फुले’ हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे.

प्रतीक गांधी यांनी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनी सावित्रीबाई फुलेंची भूमिका केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जाति निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशकालीन भारतात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. शेतकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांची प्रेरणादायी कथा आता रूपेरी पडद्यावर आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा आढावा घेत नाही, तर सामाजिक समतेचा लढा नव्या पिढीसमोर आणणार आहे. काही संघटनांनी फुले चित्रपटातील काही दृष्य आणि संवाद यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा चित्रपट नियोजित वेळी प्रदर्शित होऊ शकलेला नाही. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यात नेमके काय बदल करण्यात आले आले. मूळ चित्रपट कसा होता. याबाबत कमालिची उत्सुकता प्रक्षेकांमध्ये दिसून येत आहे.

ज्योतिबा फुले यांनी समाजातील अनिष्ठ प्रथा आणि परंपरांविरोधात आवाज उठवला. समाजाला धुडकावून त्यांनी सर्वात आधी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले. ज्या काळात समाजात बालविवाह, सती जाणे, विधवांचे मुंडन करणे यांसारख्या प्रथा राजरोसपणे सुरू होत्या. ही कथा सुमारे १२५ वर्षांपूर्वीची आहे.पत्रलेखा यांनी सावित्रीबाईंचे पात्र साकारले आहे, त्याबद्दल तिचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमीच आहे. ती तुम्हाला सावित्रीबाई फुलेंसारखी दिसते, एका दृश्यात जेव्हा एक माणूस तिला धमकी देतो की, जर तिने मुलींना शिकवणे थांबवले नाही तर तो तिचा नवरा ज्योतिबा फुले यांना मारेल, तेव्हा पत्रलेखा त्याला एक गोष्ट सांगते आणि त्याला जोरदार चपराक मारते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या पुढाकाराने या शोचे आयोजन करण्यात आले.