ड्रॅगन पॅलेस विपश्यना केंद्राचे उद्घाटन गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानात मानवता केंद्रस्थानी आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतीदूत गौतम बुद्धांचे अहिंसा, प्रेम आणि करुणेचा संदेश देणारे विचार मार्गदर्शक व समर्पक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील विपश्यना ध्यान केंद्राचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापक अॅड. सुलेखा कुंभारे आदी उपस्थित होते. राष्ट्रपती पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ही अध्यात्माची पावनभूमी असून आस्था आणि ज्ञानासाठी सुपरिचित आहे. गौतम बुद्धांचे ज्ञान आणि तत्त्वज्ञान आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्याच विचारधारेवर आपले संविधान आधारलेले आहे. विपश्यनेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात सुरू असलेले कार्य उल्लेखनीय आहे. विपश्यना पद्धती आज जगभर अनेकजण आत्मसात करीत असून ती लोकप्रिय होत आहे. बुद्धांची ध्यानाची संकल्पना आणि उपासना पद्धतीच विपश्यना आहे. यामुळे शरीर शुद्ध करण्यास मदत होते. मुख्यमंत्री म्हणाले, ड्रॅगन पॅलेस व दीक्षाभूमी ही दोन्ही स्थळे नागपूर तसेच देशाची ओळख बनली आहेत. या विपश्यना केंद्राच्या माध्यमातून गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश जगभर पोहोचवला जाईल. गौतम बुद्धांचे सत्य, अहिंसा हे पंचशील विचार सर्वासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ड्रॅगन पॅलेस येथे वैशिष्टय़पूर्ण विपश्यना केंद्र उभारणीचे स्वप्न होते, ते साकार होत असल्याबद्दल अॅड. सुलेखा कुंभारे यांनी समाधान व्यक्त केले. ड्रॅगन पॅलेसमधील वैशिष्टय़पूर्ण विपश्यना केंद्र गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान जगभर पोहचवणारे केंद्र ठरेल, असा आशावाद सामाजिक न्यायमंत्री अॅड. राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. रामटेकच्या जैन मंदिराला भेट आमच्या प्राचीन संस्कृतीचे महत्त्व देशवासीयांना व जगभरातील नागरिकांना कळावे, यासाठी भारतीयत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यात यावा, असे आवाहन जैन मुनी आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केले. रामटेक येथील ऐतिहासिक शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये सध्या संयम स्वर्ण महोत्सव सुरू आहे. आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांची दीक्षा घेण्याला २०१७-१८ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रामटेक येथे जैन मंदिराला भेट दिली. यावेळी आचार्य विद्यासागर महाराज यांनी राष्ट्रपतींशी संवाद साधला.