यवतमाळ : राज्यात मान्सूनचे आगमन होवूनही गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाची अखेर यवतमाळ जिल्ह्यावर कृपादृष्टी झाली. बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाची ही संततधार आजही कायम आहे. आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खोळंबलेल्या पेरण्या आता पूर्ण होणार आहे.

राज्यात मे महिन्यात वळवाच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली. अनेक जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळला. त्यानंतर यावर्षी मान्सून नेहमीपेक्षा आठ दिवस आधी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार पावसाचे राज्यात सर्वत्र आगमन झाले, मात्र विदर्भाकडे पाऊस फिरकला नाही. मे महिन्यातील पावसाच्या भरवशावर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली होती. मात्र जूनमध्ये मृगाचा महिना कोरडा गेल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले होते. राज्यात एकीकडे पूर परिस्थिती तर यवतमाळ जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा असे चित्र होते. दरम्यान अनेक ठिकाणी हलकासा पाऊस कोसळत होता. मात्र यामुळे पिकांना संजीवनी मिळण्याची शक्यता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.

जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी ७ वाजतानंतर मात्र अनेक तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यवतमाळसह घाटंजी, महागाव, उमरखेड, आर्णी, पुसद आदी सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. आज गुरूवारी सकाळी १० वाजेपर्यंत जवळपास ७० मिमी पाऊस कोसळल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे खोळंबलेली पेरणीची कामे पूर्ण होणार आहे. जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ ५१ टक्केच पेरणी पूर्ण झाली होती. कालपासून सुरू असलेल्या पावसाने या आठवड्यात १०० टक्के पेरणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी, नाल्यांच्या काठावरील गावांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी बैलबंडीसह नाल्यात बुडाला

गावालगतच्या नाल्यावर बैलांना पाणी पाजण्यासाठी घेवून गेलेल्या शेतकऱ्याचा बैलबंडीसह नाल्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे बुधवारी घडली. राजू किसनाजी रोकडे (५५, रा. दहेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या दुर्घटनेत शेतकऱ्यासह एका बैलाचाही मृत्यू झाला. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसा, राजू रोकडे हे नेहमीप्रमाणे शेतात जाण्यासाठी बैलगाडी घेवून घरून निघाले. रस्त्यात बैलांना पाणी पाजण्यासाठी नाल्यावर थांबले असता बैलगाडी नाल्यात कोसळून त्यांचा व एका बैलाचा मृत्यू झाला. घटनेचा तपास वडकी पोलीस करत आहेत.