‘कर्जमाफी मागितली तर लाथा, हमीभाव मागितला तर शिवी’ राज्यातील कोणत्याही विरोधी पक्षनेत्याच्या तोंडी शोभून दिसावी अशी ही वाक्ये. मात्र, ती वापरली आहेत ‘दक्षिणायन’च्या नावाखाली एकत्र आलेल्या उपराजधानीतील बुद्धिवाद्यांनी! लेखक, कवी, चित्रकार, कार्यकर्ते अशांचा हा समूह शेतकऱ्यांना शिवी देणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात रस्त्यावर उतरला. या साऱ्यांच्या निषेधाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी या कृतीने काही प्रश्न मात्र निश्चितच निर्माण केले आहेत. भाजपचे नेते दानवे शेतकऱ्यांविषयी जे बोलले ते अत्यंत निषेधार्ह आहेच, शिवाय सत्तेचा माज किती चढला आहे हेच दर्शवणारे आहे. मात्र त्यासाठी थेट विचारवंतांनीच विरोधी पक्षाच्या भूमिकेत शिरणे कितपत योग्य आहे? विरोधासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या या समूहाला खरोखर शेतकऱ्यांविषयी कळवळा आला आहे की या निषेधाच्या आडून ते मोदीविखार व्यक्त करत आहेत, यावरही चर्चा होणे गरजेचे आहे. कर्जमाफी मागितली तर लाथा असे हा समूह म्हणतो. राज्यात भाजप सत्तेत येण्याच्या आधी जी सरकारे होती, त्यांनी शेतकऱ्यांना लाथा घातल्या नाही का? न्याय्य मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला नाही का? तेव्हाच्या सरकारने एकदा कर्जमाफी दिली, त्याचा विदर्भातील शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही, हे वास्तव साऱ्यांना लगेचच कळले. तरीही त्या सरकारच्या कार्यकाळात हे विचारवंत हातावर हात व तोंडावर बोट ठेवून शांत का बसले होते? तेव्हा त्यांना असे निषेधात्मक आंदोलन का करावेसे वाटले नाही? हमीभाव मागितला तर शिवी हे या बुद्धिवाद्यांचे पुढचे वाक्य आहे. आधीच्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांनी पाणी मागितले तर धरणात मूत्रविसर्जन करू काय, अशी भाषा सत्ताधाऱ्यांनी वापरली होती. त्या विरोधात यापैकी कुणी रस्त्यावर उतरल्याचे स्मरत नाही. दानवेंसारखी शिवराळ भाषा देशात प्रथमच बघायला मिळत आहे असे हा समूह म्हणतो, मग मूत्रविसर्जनाची भाषा शिवराळ नव्हती का? तेव्हाची भाषासुद्धा शिवराळ होती हे या समूहाला मान्य असेल तर ‘देशात प्रथमच’ या शब्दाचे प्रयोजन नेमके कशासाठी? शेतकऱ्यांविषयी असभ्य भाषेचा वापर करणारे दानवे काही पहिलेच राजकारणी नाहीत. याआधी अनेक नेत्यांनी व्यवस्थेमुळे कायम पिचलेल्या अवस्थेत वावरणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान वारंवार केला आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकरी आत्महत्या का करतात, असा प्रश्न विचारून बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळले होते. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी मी दिली असा दावा करणारे शरद पवार राज्यातील सत्ता जाताच पुन्हा यवतमाळला जाताना आत्महत्येची कारणे जाणून घेण्यासाठी जात आहोत असे बरळले होते. महसूल मंत्री असताना नारायण राणेंनी दारूमुळे शेतकरी आत्महत्या करतात असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. नेत्यांच्या या विधानावर या बुद्धिवाद्यांना तेव्हा आक्षेप घ्यावासा वाटला नाही. हे नेते वा त्यांचे पक्ष आपण बाळगत असलेल्या विचारसरणीशी साधम्र्य सांगणारे आहेत, म्हणून हे बुद्धिवादी तेव्हा चूप बसले असतील तर ती त्यांनी स्वत:च्याच विचारांशी केलेली प्रतारणा होती असा निष्कर्ष आज निघतो. शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालले आहेत. सध्याच्या घटकेला हा अतिशय संवेदनशील विषय झाला आहे. अशा विषयाला हात घातला की साऱ्यांचे लक्ष वेधता येते हे राजकारण्यांना कळून चुकले आहे. तीच वाट आता हे बुद्धिवादीही धरत असतील तर राजकारणी व यांच्यात काहीच फरक राहात नाही. गेली दोन दशके संपूर्ण विदर्भ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी चर्चेत आहे. या काळात या प्रश्नाला भिडण्याची ताकद या समूहाने का दाखवली नाही? आज निषेध करणाऱ्यांच्या या वर्तुळातील अनेकजण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नामवंत आहेत. त्यातील काहींनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कामही सुरू केले आहे. अशांची पोटतिडीक एकदाची समजून घेता येईल, पण आजवर या प्रश्नाकडे ढुंकूणही न बघणाऱ्या इतरांचे काय? चला या निमित्ताने उजव्या विचारधारेला ठेचता येते, या समाधानातून हे बुद्धिवादी या निषेधात सहभागी झाले असतील तर तो शेतकऱ्यांशी केलेला द्रोहच ठरतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हेच नाही तर आधीची सर्वच सरकारे केवळ राजकारण करत आलेली आहेत. शेतकऱ्याला भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांना हातच लावायचा नाही व नुसती पोपटपंची करत राजकारण करायचे हेच गेली अनेक वर्षे सुरू आहे. पक्षीय अभिनिवेश बाजूला सारत राजकारण्यांचा दुटप्पी चेहरा उघडा पाडण्याचे काम आपापल्या कार्यक्षेत्राच्या माध्यमातून बुद्धिवाद्यांनी करणे ही आताची खरी गरज आहे. ते न करता केवळ दानवेंच्या एका शिवीचा आधार घेत राजकीय आखाडय़ात उतरायचे हा प्रकार या बुद्धिवाद्यांच्या वर्तुळाला शोभणारा नाही. राजकारणात अशी असभ्य भाषा नेत्यांकडून अनेकदा वापरली जाते. त्याला प्रतिस्पध्र्याकडून उत्तरेही दिली जातात. एकूणच आरोप-प्रत्यारोपाच्या या फैरी सुरूच राहतात. त्यात बुद्धिवाद्यांनी उडी घेऊन शेतकऱ्यांच्या कळवळ्यापेक्षा मान्य नसलेल्या विचारसरणीविरुद्धचा विखारच दाखवून दिला आहे. सध्या सत्ताधाऱ्यांनी अनेक पातळीवर विरोधी सुराचे दमनपर्व सुरू केले आहे. या पर्वात कुठे जबरदस्ती आहे तर कुठे हिंसा आहे. अनेक पातळीवर तर हे पर्व विरोधकांचा आवाज दडपणारे आहे. खानपानापासून तर अभ्यासक्रमापर्यंत या पर्वाची व्याप्ती आहे. त्याला आपल्या कार्यक्षेत्राच्या माध्यमातून न डगमगता विरोध करणे हे बुद्धिवाद्यांचे काम आहे. ते करायचे सोडून अशा उठवळ भूमिका घेत प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होणे या समूहाला शोभणारे नाही. यातून विश्वसनीयतेलाच धक्का पोहचतो आणि मग ऐकणारे सुद्धा कुणी नसते. अण्णा हाजारेंची आजची अवस्था या बुद्धिवाद्यांनी नुसती आठवून बघावी म्हणजे आपण कुठे चुकतो आहोत हे या साऱ्यांना कळेल. हा निषेधाचा मार्ग अनुसरताना या समूहाने दानवेंचा शब्द म्हणजे शेतकऱ्याच्या काळजात घुसलेला खिळा असे वर्णन केले आहे. शेतकऱ्याच्या काळजात घुसलेला हा खिळा आजचा नाही. काळजाला भोक पाडणारा हा खिळा जुनाच आहे व आजवरच्या साऱ्या राज्यकर्त्यांनी तो ठोकून घट्ट करत आणला आहे. बळीराजाच्या काळजाला झालेली ही जखम बरी करण्याची दानत आजच्या सत्ताधाऱ्यांमध्येही नाही व विरोधकांमध्येही नाही. दानवेंच्या शिवीने या जखमेत तसूभरही फरक पडणारा नाही. हे ध्यानात
येऊनही केवळ वैचारिक विरोधाची भूक भागवण्यासाठी या बुद्धिवाद्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर नोंदल्या गेलेल्या शिवीचा आधार घेत विरोधाचा मुखवटा घालावा हा सर्वात मोठा विनोद आहे.
devendra.gawande@expressindia.com