Ravi Rana : यंदाच्या निवडणुकीत भरभरुन आशीर्वाद न दिल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेईन, असं विधान बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले होतं. या विधानावरून आज संजय राऊत यांनी रवी राणा यांच्यावर सडकून टीका केली होती. रवी राणा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत होतील, असेही ते म्हणाले होते. दरम्यान, या टीकेला आता रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले रवी राणा?

“मी अमरावती जिल्ह्याचा सुपूत्र आहे. एक मराठी माणूस म्हणून मी महाराष्ट्रावर प्रेम करतो. मात्र, माझा संजय राऊतांना प्रश्न आहे, ते कधी ग्रामपंचायतीची किंवा महानगरपालिकेची निवडणूक तरी लढले आहेत का? राज्यसभेच्या निवडणुकीतही ते अर्धा मताने जिंकून आले. आजपर्यंत लोकांमध्ये जाऊन ते कोणतीही निवडणूक लढले नाहीत. पण ते दुसऱ्यांना पाडण्याच्या गोष्टी करतात, असं प्रत्युत्तर त्यांनी संजय राऊत यांना दिलं. पुढे बोलताना, संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी,त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही”, असं आव्हानही त्यांनी दिलं.

हेही वाचा- Devendra Fadnavis : “लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेऊ ” म्हणणाऱ्या रवी राणांना देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं; म्हणाले, “अरे वेड्यांनो…”

“संजय राऊत हे कधीही लोकांमधून निवडून आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. संजय राऊत फक्त सिल्वर ओक आणि १० जनपथवर जाऊन लोटांगण घालू शकतात किंवा मातोश्रीची चौकीदारी करू शकतात. जनतेच्या हिताचं एकही काम त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही”, अशी टीकाही रवी राणा यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

संजय राऊत काय म्हणाले होते?

दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावरून संजय राऊत यांनी रवी राणा यांच्यावर सडकून टीका केली होती. “हे पैसे रवी राणा यांच्या खिशातून आले आहेत का? हे पैसे काढून घेणारे तुम्ही कोण?” असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता. तसेच “रवी राणा यांच्या पत्नी अमरावतीतून पराभूत झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल. यावेळी रवी राणादेखील पराभूत होतील. त्यांची मानसिकता भ्रष्ट झाली आहे”, अशी टीकाही त्यांनी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवी राणांनी नेमकं काय विधान केलं होतं?

आमदार रवी राणा यांनी सोमवारी लाडकी बहीण योजनेबाबत एक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. “सरकारने महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळीनंतर ही रक्कम वाढवून तीन हजार रुपये केली पाहिजे. आज सरकारने तुम्हाला १५०० रुपये दिले आहेत. उद्या तुमचा भाऊ म्हणून मी ही रक्कम तीन हजार करण्याची विनंती सरकारकडे केली, तर तुम्हाला तीन हजार मिळू शकतात. पण ते तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही मला तुमचा भाऊ म्हणून मतरुपी आशीर्वाद द्याल. पण जर तुम्ही या निवडणुकीत मला आशीर्वाद दिला नाही, तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन”, असं आमदार रवी राणा म्हणाले होते.