यवतमाळ – बाभूळगाव येथील तत्कालीन प्रभारी तहसीलदारांवर रेती तस्करांनी जीवघेणा हल्ला केला. त्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ करून पोलिसांनी रेती तस्करांनाच अभय दिले. या प्रकरणी तत्कालीन तहसीलदारांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना ७ एप्रिल रोजी गोपनीय पत्र देऊन दोषींवर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. या पत्रात पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रेती तस्करांशी असलेल्या संबंधांमुळे गंभीर गुन्ह्यांमध्येही योग्य कारवाई होत नसल्याचे म्हटले आहे.

या पत्राची दखल घेत, पोलीस अधीक्षकांनी बाभूळगाव पोलीस ठाण्यातील जमादारास तडकाफडकी निलंबित केले. अशोक गायकी, असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तत्कालीन तहसीलदारांनी पत्रात नमूद केल्यानुसार, ५ एप्रिल रोजी मौजा येरणगावजवळ महसूल पथकाने रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालक हुज्जत घालून ट्रॅक्टरसह पळाला. तत्कालीन तहसीलदारांनी स्वतः शासकीय वाहनाने पाठलाग करून ट्रॅक्टर थांबवला. मात्र, चालकाने पुन्हा हुज्जत घालून तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर ट्रॅक्टर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधानाने तहसीलदारांच्या चालकाने वाहन बाजूला घेतल्याने अनर्थ टळला, परंतु वाहनाचे नुकसान झाले.या जीवघेण्या हल्ल्याची फिर्याद देण्यासाठी तत्कालीन तहसीलदार स्वतः पोलीस स्टेशनला गेले असता, दोन तास थांबूनही ठाणेदाराने दखल घेतली नाही. अखेरीस, अत्यंत किरकोळ कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.

वास्तविक पाहता, रेती चोरी, शासकीय कामात अडथळा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न कलम ३०८ यांसारखे गंभीर गुन्हे नोंदवणे आवश्यक होते, असे तहसीलदारांनी पत्रात नमूद केले आहे. पोलिसांची ही कृती रेती तस्करांना सहकार्य करण्यासारखीच आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. याच पत्रात, जमादार अशोक गायकी हे रेती तस्करांना धाडीची आगाऊ सूचना देत असल्याचा आणि वाहने पळवण्यास मदत करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलीस तस्करांना एफआयआर झाल्यावर बघून घेऊ, असे आश्वासन देत असल्याने तस्कर मुजोर झाले असून महसूल पथकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे पत्रात म्हटले आहे. यासंदर्भातील संभाषणाच्या कॉलमध्येही अशाच प्रकारच्या संगनमताचे आणि संरक्षणाचे संकेत मिळत असल्याचे दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्कालीन तहसीलदारांनी या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी अशोक गायकी याला तडकाफडकी निलंबित केले. अशोक गायकी याच्या ऑडिओ क्लिपमधील संभाषण आणि त्याचे रेती तस्करांशी असलेले अर्थपूर्ण संबंध चौकशीत आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. पोलीस विभागात राहून चुकीचे काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देतानाच कोणीही या पद्धतीने चुकीची कामे करून पोलीस विभागाची बदनामी करू नये, असे आवाहन अधीक्षक कुमार चिंता यांनी केले आहे.