अमरावती : आषाढी एकादशीची पंढरपूर वारी ही वर्षातील सर्वात मोठी वारी (दिंडी) असून या वारीचे महत्त्वही तेवढेच आहे. त्यामुळे या वारीत मोठ्या संख्येत वारकरी सहभागी होत असतात.
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री बेंडोजी बाबा संस्थानतर्फे १३६ वर्षांच्या परंपरेचे पालन करत यंदाही पायदळ वारीचे प्रस्थान झाले आहे. भाविकांसह पायदळ वारी रवाना झाली. ही दिंडी ९ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या वर्षीच्या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे ५२ भाविकांच्या पायदळ दिंडीत महिलांचा लक्षणीय सहभाग. दिंडीचे पूजन प्रशांत घुईखेडकर (विश्वस्त) यांनी सपत्निक केले. यानंतर पवित्र पादुकांचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर गावातील चंद्रभागा नदीकडे दिंडी मार्गस्थ झाली.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील माउलींच्या रथामागील एकूण २१ मानाच्या दिंड्यापैकी मानाची दिंडी म्हणून संत बेंडोजी महाराज संस्थान, घुईखेडच्या दिंडीचा १७ वा क्रमांक आहे. या रथामागे विदर्भ प्रांतातून जाणारी घुईखेड येथील एकमेव दिंडी आहे. संत बेंडोजी महाराज संस्थान १३३७ मधील असून ही वास्तू प्राचीन असल्याचा इतिहास दर्शवतो.या पायी दिंडी सोहळ्याची वारकरी संप्रदायाची परंपरा एकूण १३ दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून चालत आलेली आहे. तसेच २१ व्या शतकातही पायी दिंडी सोहळ्याची प्रथा आजही अविरत व यशस्वीपणे सुरू आहे. पंढरपूरच्या मार्गात अनेक गावात दिंडीच्या थांबण्याची, नाश्ता, चहा व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
१० जुलै रोजी दिंडी परतीच्या प्रवासात आळंदीकडे रवाना होणार आहे. या सोहळ्यात पांडुरंग भोयर, प्रथमेश गिरी महाराज, किशोर येवले, उत्तम गावंडे, विशेष गावंडे, गोळे महाराज, किशोर मेहर, गजानन फिस्के, बंडू बनकर, नंदू काकडे, वामन क्षीरसागर, कैलास सावनकर, यशवंत काकडे, शिवानी बोबडे, संजय चणेकर, बबन कोठाडे, दादा क्षीरसागर, बजरंग शिंदे, नीलेश सरकटे, भारत वानखडे, विकास वानखडे, संगम तायडे, बंडू नाचणे यांच्यासह परिसरातील शेकडो भाविक सहभागी झाले होते.
संत बेंडोजी महाराज (संजीवन समाधी) यांच्या ४७ दिवसांच्या पायी दिंडीत घुईखेडसह आजूबाजूच्या गावांतील भाविक घरदार, संसार, सुख-दु:ख सर्व विसरून सामील झाले. शेकडो वारकरी घुईखेड येथून प्रस्थानापासून ते पंढरीपर्यंत भजन, कीर्तन करत वारीत सामील झाले. यंदा प्रथमच पावसाळी वातावरणात दिंडीला प्रारंभ झाला आहे.