वर्धा : राज्यातील भाजपचे काही जिल्हाध्यक्ष घोषित करण्यात आले. मात्र त्यात विदर्भातील चार जिल्ह्याचे अध्यक्ष घोषित नं झाल्याने उत्सुकता वाढली आहे. वर्धा जिल्ह्याचे अध्यक्षपद पण जाहीर झालेले नाही. खरे तर विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनाच पुन्हा संधी देण्याबाबत जवळपास एकमत झाल्याचे म्हटल्या जात होते. आमदार दादाराव केचे यांनीच गफाट नव्हे तर अन्य नाव सुचवून प्रथम पेच उभा केला होता. पण गफाट यांना संधी नाकरण्याचे कारण काय, असा प्रश्नही झाला.

माजी खासदार रामदास तडस यांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात ज्याला अधिक मते, त्यालाच अध्यक्ष करण्याची जाहीर भूमिका मांडली होती. असे सर्व स्पष्ट असतांना माशी कुठे शिंकली, अशी चर्चा आता जोरात सूरू झाली आहे. त्यातच जिल्हा नेते नव्हे तर वरिष्ठ स्तरावरच भेद असल्याची माहिती पूढे आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व संघटन सचिव उपेंद्र कोठेकर यांना वेगळी नावे अपेक्षित आहे. कोठेकर गोटातून माजी नगराध्यक्ष अतुल तराळे  तर बावनकुळे गोटातून प्रदेश सचिव सरिता गाखरे यांची नावे पुढे केल्या जात असल्याची माहिती एका आमदाराने दिली.

तराळे यांच्याप्रती कोठेकर यांचा आग्रह पण लपून नाही. मात्र सरिता गाखरे यांचे नाव अचानक आघाडीवर आल्याने सर्व पेचात पडले आहे. त्या जिल्हा परिषद अध्यक्ष राहून चुकल्या आहेत. या संदर्भात विचारणा केल्यावर सरिता गाखरे म्हणाल्या की आमच्या पक्षात गटाचा, कोण्या नेत्याचा असा शिक्का चालत नाही. योग्यतेनुसार संधी दिल्या जाते. राज्यात काही ठिकाणी महिलांना संधी देण्याची भूमिका पुढे आली होती. सध्या घोषित जिल्हाध्यक्षपैकी केवळ तीन ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे. मला ही जबाबदारी मिळाल्यास मी ती चांगल्या पद्धतीने पार पाडू शकेल असा मला विश्वास आहे.

मी जिल्हा परिषद अध्यक्षपद सक्षमपणे सांभाळले होते. प्रदेश सचिव म्हणून मला जबाबदारी मिळाली. तसेच गाव चलो अभियानाची राज्य संयोजक म्हणून मला जबाबदारी देण्यात आली. त्याचे राज्य भाजपतर्फे मीच दिल्लीत प्रतिनिधित्व केले होते. आमच्या आर्वी मतदारसंघातील दोनही आमदार मलाच समर्थन करतील. पण असे कोणाचे समर्थन पाहून भाजपमध्ये निवड होत नसते. मला कुणाचाच विरोध नाही, अशी माझी भावना आहे. शेवटी मी स्वतः काही अध्यक्षपद मिळण्यासाठी प्रयत्न करीत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्ष ज्याला संधी देईल, त्याला सहकार्य करायचे, हे पक्के. मला मिळाली तर आनंदच होईल, अशी प्रांजळ भावना सरिता गाखरे व्यक्त करतात. एक अन्य बाब आहेच. घोषित जिल्हाध्यक्षपैकी एकही तेली समाजाचा नाही. यापूर्वी पण विदर्भातून एकही तेली समाजाचा जिल्हाध्यक्ष नं झाल्याने ओरड झाली होती. आता पण एकही नसल्याने तेली समाज संघटना नेते अस्वस्थ झाल्याचे दिसून येते. वर्धा जिल्हाध्यक्ष घोषित नं झाल्याने कार्यकर्ता वर्तुळ  स्तब्ध झाल्याचे दिसून येते.