गोंदिया : यंदा मान्सून लवकर येणार, वेळेवर येणार,असे सांगितले जात असताना आता जून महिना अर्धा पेक्षा अधिक लोटूनही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. परिणामी, आज ही रखरखत्या उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जिल्ह्यात १९ जून पर्यंत सरासरी १०२.८ मिमी पाऊस अपेक्षित असताना फक्त सरासरी १६.८ मिमी पाऊसच बरसला आहे. पावसाळ्याची सुरुवातच तुटीने झाली असून,यात सरासरी ८६ मिमी पावसाची तूट आहे.
हवामान विभागाने यंदा एप्रिल महिन्या पासूनच यंदा लवकर मान्सून येणार असून, चांगला पाऊस बरसणार, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार, एप्रिल महिन्या पासून अवकाळी पावसाची शुरुवात झाली व मे महिन्यातील शेवट पर्यंत अवकाळीनेच वेळोवेळी हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्यात काही भागांत अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे नुकसान झाले.
सद्यस्थितीत संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी खरिपाची तयारी करून केवळ पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. ७ जून पासून मृगाला सुरुवात झाली व आता १९ जून लोटला, पण दरम्यान जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही. तर पावसाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने उकाड्याने ही जिल्हावासीय त्रस्त झाले आहे. १९ जून पर्यंत सरासरी १०२.८ मिमी पाऊस अपेक्षित असतानाच फक्त १६.८ मिमी पाऊस जिल्ह्यात बरसला आहे.
बळीराजाच्या नजरा आकाशाकडे
हवामान खात्याचा अंदाज यंदा काही तंतोतंत बसताना दिसत नसल्याची स्थिती आहे. कारण, हवामान खात्याकडून पूर्वी व्यक्त केलेला अंदाज चुकला असतानाच आता दररोज येलो अलर्ट देऊनही पाऊस काही हजेरी लावत नसल्यानेच चित्र आहे. जून महिना लागताच पाऊस बरसणार, अशी आशा बाळगून शेतकऱ्यांनी उन्हाचे चटके सहन करीत खरिपाची तयारी करून घेतली. मात्र, जून महिना अर्धा लोटूनही पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी आकाशाकडे नजरा लावून आहेत.
पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
गोंदिया जिल्ह्यात २ लाख १० हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. यात धानाचे क्षेत्र अधिक राहते.जिल्ह्यात अद्यापही पेरणी योग्य दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पावसा अभावी पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे.