नागपूर: तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट आपण सारे पाहत होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय हा लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारा आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट आपण सारे पाहत होतो. लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत. कार्यकर्त्यांच्या हक्काचे दान आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पदरात टाकले. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी, चौंडी येथे आज महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ आहे. या पावनभूमीत असताना हा निर्णय झाला. मी न्यायालयाचे मन:पूर्वक स्वागत करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र पुढे नेत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचे सुकाणु हाती घेतले आहे. या निवडणुकांमुळे विकसित महाराष्ट्राला गती मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कायदेपंडितांशी सतत सल्लामसलत केली. आज त्याला यश आले.गेल्याच आठवड्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला. जनतेच्या आशा आकांक्षाना शक्ती देण्याचे काम सरकार व न्यायालयाकडून होत आहे.

येणारी निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. तन मन धनाने कार्यकर्ते समाजसेवा करत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आज नक्कीच फुलले असणार. मी सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली