लोकसत्ता टीम

चंद्रपूर : जिल्ह्यातील सोयाबीन पिकांसाठी पावासाचे दोन ते तीन मोठे खंड पडल्याने वातवरणाचे तापमान व जमिनीचे तापमान प्रचंड वाढले. त्यामुळे सोयाबीनवर मुळकूज व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकांला मोठा फटका बसल्याचा अहवाल जिल्ह्यात आलेल्या कृषी शास्त्रज्ञांच्या पथकाने राज्य शासनाकडे सादर केला आहे.

जिल्ह्यात सोयाबीन पीक काढणीला येत असताना अचानक सोयाबीन शेंगांमध्ये दाणे भरणे बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले सोयाबीन पीक गेल्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला होता. सोयाबीनवर कोणता रोग आला याचा शोध घेण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना व अभ्यासासाठी शास्त्रज्ञाचे पथक जिल्ह्यात आले. या पथकात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कृषी विद्या प्रमुख डॉ. वर्षा टापरे, प्रजननशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत मिसळ, शेतक शास्त्रज्ञ डॉ. मुंजे, वनस्पतिरोगशास्त्र डॉ. गावडे, कृषी विद्याशास्त्रज्ञ डॉ. दांडगे, जिल्हा कृषी अध्यक्ष डॉ. शंकर तोटावार वहानगाव, बोथली, वरोरा तालुक्यातील चिनोरा, शेबंड, राजुरा, पांढरपौणी, थुर्टा येथील शेतकऱ्यांच्या शेतात भेटी देवून सोयाबीनची पाहणी केली.

आणखी वाचा-चंद्रपूर: एक आक्टोंबरला एक तास गावाच्या स्वच्छतेसाठी

पाहणी केल्यानंतर शास्त्रज्ञांनी आपला अहवाल दोन दिवसात सरकारकडे सादर केला आहे. या अहवालात जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर पावसाचे दोन ते तीन मोठे खंड पडले. त्यामुळे चारकोल रॉट व रायझोक्टोनिया करपा रोग झाला. अचानक झालेल्या बदलामुळे सोयाबीन पिकांवर परिणाम झाला. यादरम्यान खोडमाशी, चक्रभुंगा या किंडीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांचे मुख्य खोड पोखरल्या जावून अन्नाचे वहन कमी होवून झाडे अशक्त झाली शेंगा भरण्याचा अवस्थेमध्ये पाने पिवळी पडली. सोयाबीनच्या अनेक वाणावर यांचा मोठा परिणाम झाल्याचा अहवाल त्यांनी राज्य शासनाकडे सादर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोयाबीन पिकांवर आलेल्या पिवळेपणा हा ‘पिवळा मोझॅक’ नसून वातावरणातील बदलामुळे, किडी व रोगांचा प्रकोप वाढल्यामुळे विशेषत: मुळकूज व करपा रोगामुळे सोयाबीनवर पिवळेपणा आल्या असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.