विषप्रयोग करून एक वाघीण आणि दोन बछडय़ांची शिकार केल्याची घटना चिमूर वनपरिक्षेत्रातील मेटेपार गावाजवळ उघडकीस आली असून याप्रकरणी वन विभागाने एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळाजवळ एक वासरू मृतावस्थेत आढळले आहे. वासराचे विष टाकलेले मांस खाल्ल्याने वाघीण आणि तिच्या दोन बछडय़ांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन बछडय़ांपैकी एक मादी आणि एक नर आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून चिमूर वनपरिक्षेत्र आहे. मेटेपारचे शेतकरी लक्ष्मण डोमाजी सावसाकडे यांचे नाल्यालगत शेत आहे. डोमा येथील काही जण सोमवारी सकाळी सावसाकडे यांच्या शेतातील जांभूळ झाडाचा सौदा करण्यासाठी आले असता त्यांना वाघीण आणि आठ-नऊ महिन्यांचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. माहिती मिळताच चिमूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चिवंडे, ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक कुलराजसिंग घटनास्थळी आले. मृतावस्थेत पडलेली वाघीण आणि बछडय़ांपासून काही अंतरावर एक वासरूही मृतावस्थेत आढळले. त्याचे दोन पाय तुटलेले होते. याबाबत चंद्रपूर वनवृत्ताचे प्रधान मुख्य वनसंरक्षक रामाराव म्हणाले की, मृतावस्थेतील वासरू पांडुरंग चौधरी या शेतकऱ्याचे आहे.
त्याने वासराच्या मृत शरीरावर विष टाकले. ते वाघीण आणि तिच्या बछडय़ांनी खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. वाघीण आणि तिच्या बछडय़ांचे शवविच्छेदन ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ. नगराळे, डॉ. कुंदन यांनी केले.
चौकशीचे आदेश
या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. याप्रकरणी घातपात किंवा शिकार झाली असल्यास तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.