अमरावती : चंद्रग्रहण हे पौर्णिमा तिथीच्या जवळपास दिसते. परंतु, प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण नसते. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत आल्यानंतर चंद्रग्रहण तयार होते. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते आणि पृथ्वीच्या सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण तयार होते. चंद्रग्रहण ही वैज्ञानिक खगोलीय घटना आहे.
७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसू शकेल. हे चंद्रग्रहण रात्री ९ वाजून ५७ मिनीटे ते १ वाजून २७ मिनीटापर्यंत दिसेल.
चंद्रग्रहण घडून येण्यासाठी पौर्णिमेचा दिवस असावा लागतो. सूर्य-पृथ्वी-चंद्र या तिन्ही गोलांचे मध्य एका सरळ रेषेत आणि पातळीत असावे लागतात. चंद्र त्याच्या परिभ्रमण मार्गातून पृथ्वीच्या शंकूच्या आकाराच्या दाट सावलीतून जातो त्यावेळी तो पूर्णपणे दिसेनासा होतो. याला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. खग्रास स्थितीतही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. त्यामुळे या ग्रहणात चंद्राचा हा भाग थोडा गडद लालसर दिसू लागतो. याला ‘ब्लड मून’ असे संबोधले जाते. एका वर्षात कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन चंद्रग्रहण होतात. ग्रहणाचे तीन प्रकार पाहायला मिळतात. खग्रास ग्रहण, कंकणाकृती ग्रहण आणि खंडग्रास ग्रहण हे ग्रहणाचे तीन प्रकार आहेत. चंद्राचा पृथ्वीच्या सावलीतून प्रवास झाला की, खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण तयार होते.
दर अमावस्या किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही कारण चंद्राची भ्रमण पातळी आयनीक पातळीशी ५ अंशाचा कोन करते. त्यामूळे पौर्णिमेला किंवा अमावस्येला चंद्र आयनिक पातळीच्या उत्तरेला किंवा दक्षिणेला असू शकतो. त्यामुळे सूर्य-चंद्र पृथ्वी एका रेषेत येऊ शकत नाही.
या विज्ञान युगात सुध्दा ग्रहणा संदर्भात समाजात अनेक अंधश्रद्धा रुढ आहेत. जसे ग्रहणात जेवण करु नये, गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहू नये, ग्रहण झाल्यावर आंघोळ करावी, दान करावे अशा अंधश्रद्धेला खगोल शास्त्रात कोठेही आधार नाही. ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास २७ मिनीटे आहे. पुढचे खग्रास चंद्रगहण ३ मार्च २०२६ रोजी होणार आहे. सर्व खगोल प्रेमींनी व जिज्ञासूंनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून कर्मकांडाच्या मागे न लागता या विलोभनीय खगोलीय घटनेचे निरीक्षण करून त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने, सचिव सुशीलदत्त बागडे व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.