चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. १२ तासांत मूल तालुक्यात वाघांच्या हल्ल्यांत दोन जणांचा मृत्यू झाला. संजिवनी संजय मॅकलवार (४५) व सुरेश मुंगरु सोपानकार (५२), अशी मृतांची नावे आहेत. या घटनांमुळे गावांत दहशतीचे वातावरण आहे.

जंगलात बांबूच्या काडया, सरपण आणि कुडयाची फुले आणण्यासाठी गेलेल्या संजिवनी मॅकलवार यांच्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना वनविकास महामंडळाच्या कम्पार्टमेंट नंबर ५२४, भगवानपूरमध्ये मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. महिलेसोबत तिचा पती संजय आणि टोलवाही येथील नातेवाईक कवडू बोमनवार, शांताबाई कवडू बोमनवार हे चार जण होते. चौघेही सकाळीच भगवानपूर येथील जंगलात गेले होते. चिरोली, टोलेवाहीपासून तीन-चार किमी अंतरावर भगवानपूर वनविकास महामंडळाचे जंगल आहे. त्याठिकाणी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने संजिवनी यांच्यावर हल्ला केला. वाघ संजिवनी यांना फरफटत नेत असताना नातेवाईक आणि पतीने आरडाओरड करून वाघाला हुसकावून लावले. तोपर्यंत संजिवनी यांचा मृत्यू झाला होता.

माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे, वनपाल शिंदे, कर्मचारी गव्हारे, अशोक सिंघण, टोलेवाही येथील पोलीस पाटील संगिता चल्लावार, चिरोली येथील पोलीस पाटील गोकूळ मोहूर्ले, चिरोली येथील वनरक्षक सविता गेडाम, प्राणीमित्र उमेश झिरे आणि मूल येथील प्रभारी पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेेदनासाठी आणण्यात आला. या घटनेने चिरोली, टोलेवाही, भगवानपूर येथे दहशत पसरली आहे. परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या घटनेत वाघाच्या हल्ल्यात कांतापेट येथील सुरेश मुंगरु सोपानकार (५२) यांचा मृत्यू झाला. सुरेश हे चिरोली मार्गावरच्या जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. बकऱ्यांचा कळपच घरी परत आल्याने गावकऱ्यांना संशय आला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. शोधकार्यानंतर सुरेश सोपानकार यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील १७ दिवसांत वाघांच्या हल्ल्यात ११ जणांचा बळी गेला. खरीप हंगाम तोंडावर असताना वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी वर्गांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.