नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या पावसामुळे यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांत ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. हवामान खात्याने पावसाचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांना भर उन्हाळय़ात अस्मानी संकटाचा सामना करावा लागणार आहे.

गेल्या तीन दिवसांपासून नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वारा आणि गारपिटीसह मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर शहरात दोन दिवस सोसाटय़ाचा वारा आणि अवकाळी पाऊस कोसळला. इतर जिल्ह्यांत वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला. सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले आहे. सुमारे ३५ हजार ३८९ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह फळबागांना पाऊस-गारपिटीचा तडाखा बसला. चांदूरबाजार, मोर्शी, वरुड व अचलपूर या चार तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले. १८ हजार ३०० हेक्टरमधील संत्री, मोसंबी, केळी, आंबा यांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील ७४ गावांमधील चार हजार ६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान पातुर तालुक्यात झाले. बुलढाणा जिल्ह्यात १०० गावांतील सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली. यवतमाळ जिल्ह्यातील अडीचशेवर गावांतील दोन हजार हेक्टरवरील पिकांना पावसाने तडाखा दिला. केळापूर तालुक्यात सर्वाधिक ७८० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. फळबागांनाही मोठय़ा प्रमाणात फटका बसला.

हेही वाचा >>>विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…

महिलेचा मृत्यू, अनेक जनावरे दगावली

’यवतमाळ जिल्ह्यात आर्णी-सावळी मार्गावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर महिलेचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले.

’वीज कोसळून दोन बैलही दगावले. वादळी पावसामुळे अनेक घरांवरील छपरे उडाली तर पाचशेहून अधिक घरांचे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यात सुमारे ५५ घरांचे नुकसान झाले.

’बुलढाणा जिल्ह्यात सुमारे तीनशेहून अधिक घरांची पडझड झाली. वीज पडून व झाडाखाली दबून १३ जनावरे दगावली. संग्रामपूर तालुक्यात वीज पडून तीन जण गंभीर जखमी झाले.

विदर्भामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी पिकांनी हानी झाली आहे. मराठवाडय़ातील बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्येही गुरुवारी गारांच्या माऱ्याने नुकसान झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी दोन दिवस पावसाचे : भारतीय हवामान खात्याने विदर्भात यापूर्वी सहा ते नऊ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. मात्र नव्या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाडय़ात १३ एप्रिलपर्यंत पावसाचा मुक्काम वाढला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीची दाट शक्यता आहे.