आम्ही चोरांच्या पंगतीत बसलो आहे. ही सत्ता चोरांची झाली आहे. त्यामुळे बदल करा आणि चांगलं राज्य आणा, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारवर केला आहे. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
“या सरकारचं मला काय खर दिसत नाही. माणुसकीहिन माणसं सत्तेवर बसली आहे. ज्यांना माणुसकी आणि माणसांचा जीव महत्वाचा नाही. यांना सत्ता आणि सत्ताचं उपयोगी आहे. पण, सत्ता येते जाते. सत्ता मतपेटीतून निर्माण होत असून, ती पाच वर्षासाठी असते. सत्ता ही अमरपट्टा नसून, तिला अमरपट्टा करण्याचं काम सुरु आहे,” असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
हेही वाचा : महाराष्ट्राच्या ठरावाला खडसेंनी म्हटलं ‘मिळमिळीत’, देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, “एकतर…”
“आधी काँग्रेसवाले आणि आता भाजपा, आरएसएस वाले म्हणत आहेत, आमच्याशिवाय कोणी राज्य करु शकत नाही. उद्या गाढव सत्तेवर आला तरी माजलेल्यांना धोपाटण दिल्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र, आताचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवतात की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कळत नाही,” असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.
“जोपर्यत लढा देत आपला अधिकार शाबूत ठेवणार नाही. तोपर्यंत ज्याला सत्ता देतो तो काबूमध्ये राहणार नाही. अन्यथा आपल्याला काबूत ठेवलं जाईल. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. आज आपल्याला जमिनीवरून हाकललं जाणार. उद्या उरलेल्या ठिकाणाहून देखील हाकलण्यात येईल,” असा सावधानतेचा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.