कट्टर विदर्भवादी नेता हरपला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक असलेले विदर्भवीर जांबुवंतराव धोटे (८२) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी विजयाताई, ज्वाला आणि क्रांती या दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. धोटे यांच्या निधनाने स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार करणारे एक आक्रमक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

जांबुवंतराव येथील अग्रवाल लेआऊट परिसरात राहतात. शनिवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांनी निवासस्थानानजीक असलेल्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. आपल्याला हृदयविकाराचा झटका आला असून तातडीने उपचार करा, अशी विनंती जांबुवंतराव यांनी डॉक्टरांना केली. त्यांचे जावई लालजी राऊत हेही त्यांच्याबरोबर होते. डॉक्टरांनी तातडीने धोटे यांच्यावर उपचार सुरू केले. पहाटे चारच्या सुमारास धोटे यांचा त्रास बळावला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. धोटे यांच्या पार्थिवावर आज, रविवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

आयुष्याची तीन सूत्रे

जांबुवंतराव धोटेंनी आयुष्याची तीन सूत्रे पाळली होती. प्रकृतीसाठी  शासकीय रुग्णालयातच उपचार घेणे, आपल्या विरोधात वृत्तपत्रात काहीही छापून आले तरी खुलासा करायचा नाही आणि वाढदिवस साजरा करायचा नाही.

जांबुवंतराव धोटे..  एका झंझावाताची अखेर!

‘व्वा रे शेर, आया शेर’ च्या घोषाणांनी ज्यांच्या नावाने सारा आसंमत एकेकाळी निनादून जायचा, ज्यांच्या उपस्थितीने विधानसभा आणि लोकसभेत वादळाची शक्यता निर्माण व्हायची, ज्यांच्या एका आवाजाने अक्षरश हजारो लोकांचे मोच्रे निघत त्या जांबुवंतराव धोटे यांचे व्यक्तिमत्व शतपलू आणि अनाकलनीय होते.

महाविद्यालयीन जीवनापासूनच नेतृत्वाचे गुण अंगी असलेल्या व पालिका शाळेत शारिरीक शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देऊन यवतमाळात नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जवाहरलाल दर्डाचा पराभव करणाऱ्या जांबुवंतराव धोटेंनी राजकारणाच्या रंगमंचावर फारवर्ड ब्लॉकमध्ये प्रवेश करून अखेपर्यंत तळपत राहण्याचा इतिहास निर्माण केला. मुळात संयुक्त महाराष्ट्रवादी असलेल्या धोटे यांनी कृषी विद्यापीठ विदर्भात व्हावे, ही विधिमंडळात केलेली मागणी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी फेटाळल्यावर कृषी विद्यापीठ विदर्भात झाल्याशिवाय विधिमंडळात पाय ठेवणार नाही, असा पवित्रा घेत आंदोलन सुरू केले. या आंदोलनात पाच बळी गेल्यावर अकोल्याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झाले तेव्हापासून मात्र धोटे विदर्भवादी झाले आणि स्वतंत्र विदर्भासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले. स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय माझी इहलोकाची यात्रा संपणार नाही, असे ते ठामपणे म्हणायचे, पण नियतीने तो विश्वास पूर्ण होऊ दिला नाही.

जांबुवंतरावांनी राजकीय जीवनाची सुरुवात फॉरवर्ड ब्लॉक या पक्षापासून केली. पुढे इंदिरा काँग्रेस, प्रणव मुखर्जीच्या पक्षासोबत, नंतर चंद्रशेखर यांच्या पक्षात, त्यानंतर शिवसेना, पुन्हा काँग्रेस, विदर्भ जनता काँग्रेस आणि पुन्हा फॉरवर्ड ब्लॉक, असे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण केलेले होते. नागपुरातील विणकरांचे आंदोलन, हिंगणघाटमधील मिल कामगारांचे आंदोलन, विधानभवनाला शेतकऱ्यांचे घेराव आंदोलन, नागपूर ते रामटेक बंधुभाव पदयात्रा, यासारख्या आंदोलनांपासून, तर इंदिरा गांधींच्या पाठिशी विदर्भात पूर्ण शक्ती उभी करण्यापासून त्यांनी अनेक आंदोलने केली. तीनदा आमदार व एकदा खासदार राहिलेल्या धोटे यांनी दोनदा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवही पाहिला.

उत्कृष्ट नट, लेखक, नेता, वक्ता असलेल्या धोटेंनी ‘जागो’ हा हिदी चित्रपट काढला आणि ‘बलिदान’ हे वर्तमानपत्रही सुरू केले होते. धोटे यांची मध्यम, पण अत्यंत मजबूत शरीरयष्टी, दणकट मनगट, हातात स्टीलचे भक्कम मजबूत कडे, काळीशार दाढी, साधू बांधतात तशा जटा, पांढरे शुभ्र एकटांगी धोतर, जाळीचे बनियन, लख्ख शुभ्र बंगाली सदरा आणि त्यावर तितकेच शुभ्र उपरणे! जांबुवंतरावांचा हा नुसता अवतार पाहूनच भल्या भल्यांना कापरे भरत असे. विधानसभेत त्यांनी भिरकावलेला पेपरवेट आणि त्यामुळे रद्द झालेली आमदारकी व पुन्हा मिळविलेला विजय, या घटना ऐतिहासिक आहे. आणीबाणीचे समर्थन करणाऱ्या धोटेंनी १९७८ मध्ये विदर्भातील दौऱ्यांचे अपूर्व आंदोलन केले होते. १९८० मध्ये वसंतदादाच्या मंत्रिमंतड्राळात भगवंतराव गायकवाड, नानाभाऊ एंबडवार आणि सुरेंद्र भुयार हे धोटेंचे कार्यकत्रे मंत्री झाले होते. स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन देऊनही इंदिरा गांधींनी ते पाळले नाही म्हणून त्यांनी कॉंग्रेसचा त्याग केला व बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. नंतर बाळासाहेबांनीही विदर्भ दिला नाही म्हणून शिवसेनेचाही त्याग केला. वैदिक पध्दत मान्य नाही म्हणत माजी अर्थमंत्री दिवं. रामराव आदीक यांची कन्या विजयाताई यांच्याशी आकाशाच्या मांडवाखाली व समुद्राच्या साक्षीने धोटे यांनी केला विवाह तेव्हा तो राज्यभर चच्रेचा विषय होता. मात्र, कन्या क्रांतीचा विवाह त्यांनी वैदिक पध्दतीने केला होता. मध्यंतरी नक्षलवादी च़ळवळीचे समर्थन केल्यामुळे ते बरेच वादग्रस्त झालेले होते. देहदानाच्या संकल्पनेला त्यांचा तीव्र विरोध होता. त्यांनी कुणाचेही नेतृत्व मान्य केले नाही आणि आपल्या स्वतच्या मतांशी प्रतारणाही केली नाही. परिणामत, एकाकी जीवन त्यांच्या वाटय़ाला आले होते. ‘वेडय़ाचं घर उन्हात’ ‘अशा डहाळ्या असे खोपे’ या गाजलेल्या नाटकात त्यांनी भूमिका केल्या होत्या. ओशा रजनीशचे ध्यान शिबीर यवतमाळात घेतल्याने लोकसत्ताने त्यांच्यावर ‘धावता धाटा’ हा उपहासात्मक अग्रलेख लिहिला होता. राजकारणी धोटे नट धाटे, चित्रपट निर्माता धोटे, स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कत्रे धोटे, पत्रकार धोटे, लढवय्ये धोटे, तापट स्वभावाचे, पण तितकेच प्रेमळ धोटे, अशी धाटेंची विविध रूपे होती. त्यांच्या निधनाने एक झंझावात,   एक सलाब, एक धगधगता अंगार शांत झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha leader jambuwantrao dhote passes away
First published on: 19-02-2017 at 04:53 IST