हजारो विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीबाबतचे गैरसमज दूर
शिष्यवृत्ती केवळ मागासवर्गीयांसाठीच नसून आर्थिक कमकुवत गटातील सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते, यासंदर्भात विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती ‘सर्च इंजिन’ तयार करून शिष्यवृत्तीबाबतचे गैरसमज दूर केले आहेत. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या जेनील सावला, शुभम अगरवाल आणि शशांक सिंग या तीन विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे सर्च इंजिन तयार करण्यात आले आहे.
महाविद्यालयांच्या प्रवेश शुल्क दिवसेंदिवस वाढ होत असताना आर्थिक विवंचनेत असलेल्या शिक्षणप्रिय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची दालने खुली केली आहेत. केवळ मागासवर्गीयच नव्हे तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही त्यांच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे शुल्क भरणे कठीण होते. मालमत्ता विकून, बँकेचे कर्ज काढून किंवा नातेवाईकांकडे हात पसरून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची उदाहरणे आहेत. अशावेळी शिक्षण सोडणे, इच्छा असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश न घेणे यासारख्या अप्रिय गोष्टी त्यांना कराव्या लागतात. कधीकधी निराशेतून आत्महत्येसारखे प्रकारही घडत असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून आले आहे. मात्र शिष्यवृत्ती केवळ मागासवर्गीयांनाच नव्हे तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही मिळू शकते आणि अशा प्रकारे मिळणारी शिष्यवृत्ती थोडी थिटकी नव्हे तर ती कोटय़वधींच्या घरात आहे.
भारतात तीन लक्ष संस्था शिष्यवृत्ती पुरवण्याचे काम करतात, हे पहिल्यांदाच या सर्च इंजिनच्या माध्यमातून जगासमोर आले आहे. संस्थांना योग्य लाभार्थीपर्यंत पोहोचण्यात आणि विद्यार्थ्यांना संस्थेपर्यंत पोहोचण्यात मुख्य अडचणी येतात, असे या तिन्ही इंजिन शोधकांना वाटते. केंद्र शासनाने यावर्षी उच्च शिक्षणातील नोंदणी टक्का ३० वर आणण्याचे निश्चित केले आहे. हा टक्का वाढवायचा असेल तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीशिवाय तरणोपाय नाही. पण या शिष्यवृत्ती शोधणे साधे काम नसून शिष्यवृत्तीविषयी समाजात बरेच गैरसमज आहेत.
शासनाव्यतिरिक्त अनेक स्वयंसेवी संस्था, न्यास, फाऊंडेशन आणि खासगी कंपन्यांद्वारेही शिष्यवृत्ती उपलब्ध करण्यात येते. जसे उच्च शिक्षणासाठी जे.एन. टाटा शिष्यवृत्ती, एन.एस. फाऊंडेशन शिष्यवृत्ती, मेस्को हाय कॉस्ट शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, कॉग्निजन्ट फाऊंडेशन शिष्यवृत्ती इत्यादी. म्हणूनच विद्यार्थ्यांनी भारतातील पहिल्या शिष्यवृत्ती शोध इंजिनचा शोध लावला आहे. या संदर्भात व्हिएनआयटीचा विद्यार्थी जेनील सावला म्हणाला, अशाप्रकारचे देशातील हे पहिलेच इंजिन आहे. ((www.ScholFin.com). शिष्यवृत्ती कशा शोधायच्या याची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यात आली आहे. भारतात विकिपेडियावरील माहितीनुसार भारतात नऊ कोटींची शिष्यवृत्ती वाटप करण्यात येते आणि तिचा लाभ ३० कोटी विद्यार्थी घेतात. म्हणजे तीन विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवतो. मात्र हे खरे नाही. कारण याविषयी शिक्षण क्षेत्रात जागृती नाही. शिवाय भ्रष्टाचार आणि अनेक कच्च्या दुव्यांमुळे खरे लाभार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात. आतापर्यंत १४ हजार ७३३ विद्यार्थ्यांनी या इंजिनला भेट दिली आहे.
शिष्यवृत्तीसंबंधीचे गैरसमज
* शिष्यवृत्ती केवळ मागासवर्गीयांसाठीच आहे.
* परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळणाऱ्यालाच शिष्यवृत्ती मिळते.
* शासनच केवळ शिष्यवृत्ती देते.
* पदवीपर्यंतच शिष्यवृत्ती मिळते.
* शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीलाच शिष्यवृत्ती मिळते.
* आर्थिक कमकुवत गटालाच शिष्यवृत्ती मिळते.