वर्धा : वर्षभरापासून गटबाजीचे चाललेले राजकारण कोणत्या टप्प्यावर जाणार, याची चुणूक दिसणे सूरू झाले आहे. बंडखोरी, चार्टर्ड फ्लाईंट, थेट गृहमंत्र्याच्या दारी, भविष्याची हमी व अखेर ती पूर्ण. असे देशपातळीवरील राजकीय टप्पे आर्वी मतदारसंघात गाजले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे आमदार झाले म्हणून विधान परिषदेवर दादाराव केचे यांना घेण्यात आले. एकाच आर्वीत राष्ट्रवादी पवारचा खासदार व भाजपचे दोन आमदार. संवादी राजकीय वातावरण राहणाऱ्या आर्वीत संघर्ष आरंभला.
आर्वी तळेगाव रस्त्यावरील दुभाजक संघर्ष निमित्त ठरले. केचे यांनी हवी असलेली रुंदी मान्य करून घेतली. त्यासाठी तटस्थ अश्या नागरिकांची म्हटल्या जाणारी समन्वय समिती सोबत घेतली. तुम्हास काय पाहिजे, तेच होईल अशी भूमिका घेत आमदार केचे जनतेचा सूर ठरले. तर आमदार सुमित वानखेडे नाहक जनमत विरोधी बनले. त्यांची भूमिका तांत्रिक, धोका टाळणारी व काम लवकर व्हावी अशी असल्याचे पटवून देण्यात ते मागे पडले, असे त्यांचेच समर्थक म्हणतात. वानखेडे यांनी कोंडाळे दूर करावे, असेही ते म्हणतात. सहाच महिन्यात लोकप्रियतेत गगनभरारी घेतलेल्या आमदार वानखेडे यांना दुभाजक प्रकरण टाचणी टोचून गेले. केचे एक पाऊल पुढे सरकले आहे. अर्थात हा तात्कालिक भाग.
मात्र हे सावरण्याचे आव्हान वानखेडेपुढे आहे. विकास मार्ग प्रशस्त करण्याची हातोटी व त्यासाठी लागणारे बळ त्यांच्याचकडे, हे आर्वीकर मान्य करतात. पण मैदानी राजकारणात केचे यांच्या पुढेही पडणाऱ्या डावपेचास त्यांना उत्तर द्यावे लागणारच. केचे यांची आमदारकी आता उरली फक्त दहा महिन्यांची. नंतर केचे स्वस्थ बसतील , हे कोणताही आर्वीकर मान्य करीत नाही. विधानसभेची आमदारकी सोडावी लागली, याची जखम केचे ओलीच ठेवतात. त्याचे व्रण दाखवितात. म्हणून आमदार वानखेडे यांना पुढील पाऊल जपून टाकावे लागणार, असे समन्वय समितीचे काही बोलून दाखवितात.
आता आर्वीत भाजप शत प्रतिशत आहे. पण विभागलेली. अन्य एक प्रस्थ सुधीर दिवे आमदार वानखेडे यांच्या पंक्तीत. तेच आर्वी मतदारसंघाच्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत निमंत्रित होते. सामान्य जनतेस त्याचा लाभच मिळणार. पण येणारी कामे ना हरकत पार पडणार कां ? असा प्रश्न दुभाजक प्रकरणाने पुढे आल्याचे म्हटल्या जाते. आर्वीत सुमित सर्वेसर्वा हे समीकरण दुभाजक प्रकरणात ठिसूळ झाले आहे. कारण त्यांच्या विरोधात पण प्रसंगी आम्ही जाऊ शकतो, हेच त्या प्रकरणाने दाखविलेले सत्य. त्यांच्या विरोधात म्हणजे केचे यांच्या बाजूने असेही कोणी म्हणणार नाही. पण लोकांना हवे त्यासाठी मीच कामाचा, असा संदेश पसरविण्यात केचे मात्र यशस्वी ठरलेत. ज्यांना आपले म्हणावं ते विशिष्ट मुद्द्यावर विरोधातही जाऊ शकतात, हे आमदार वानखेडे यांना दिसून आले असणार. आता पुढे त्यांना ताकही फुंकून प्यावे लागणार, हाच तो धडा.