वर्धा : जिथे हमखास लाखोत खेळायला मिळणार ते सोडून सर्वात बेभरवश्याच्या क्षेत्रात उतरणाऱ्यास लोकं वेडाच म्हणतील. पण असेच वेडे आपल्या यशाने लोकांना दीपवून जातात, असे म्हटल्या जाते. त्याचेच हा दाखला. येथील अभिजित रवीश सरोदे या विद्यार्थास असेच वेड शेतीने लावले. काळी आई, जीवनदायी हे त्याला अनुभवातून पटले. म्हणून आता यापुढे शेतीच करणार असा निर्धार त्याने व्यक्त केला आहे. कारण दोनच वर्षात त्याने पुरती मेहनत घेत केळीची बाग फुलविली, लगडलेली केळी थेट प्रयागराजच्या बाजारात विकली. हातात आलेला पैसा त्यास आनंद देऊन गेला.
बंगळूरू येथून बी. ई. केल्यानंतर जॉब सूरू झाला. तितक्यातच दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. तेव्हा वर्क फ्रॉम होम मिळाल्याने घरीच. वडिलांच्या पश्चात आई मीनाक्षी सरोदे या शेतीचा हिशोब पाहू लागल्या. त्या कामी आईस मदत करीत असतांना अभिजितने हिशोब तपासला. त्याला आश्चर्य वाटले. जेवढी लागत त्यापेक्षा उत्पन्न कमीच. ही शेती काय कामाची, असा त्यास प्रश्न पडला. मग आपण करून पाहायची कां शेती, असा विचार झाला. हिंगणघाट तालुक्यात इंझाळा या गावी पिढीजात मोठी शेती होतीच. ती हाती घेतली. ड्रॅगन फ्रुट, मशरूम की केळी यापैकी एक निवड करायचे ठरले. बाजारात कशाला उठाव व भाव तपासून शेवटी केळी घेण्याचे ठरले. त्यासाठी स्थानिक शेतकरी तसेच वडिलांचे मित्र प्रकाशसिंह बैस यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मदतही मिळाली. त्यांनीच मग केळीरत्न कुंदन वाघमारे यांच्याशी भेट घालून दिली. जळगाव येथे दौरे केले.
तिथल्या केळी बागा तपासल्या. ड्रीप सिस्टीम अभ्यासली. परत आल्यावर मग अभिजितने घरच्या दोन एकर शेतीत केळी लावली. ३ हजार झाडे लावून स्वतःच्या देखरेखीत ती फुलविली. झाडाला नत्र, झिंक व अन्य घटक किती प्रमाणात लागतात, याचे शास्त्र अभ्यासले. पारंपरिक शेती पद्धतीत बदल केल्याशिवाय फायद्याची शेती शक्य नसल्याचे त्याला गावातच दिसून आले होते. अपार कष्ट पण दैन्य दूर होत नसल्याचे त्याला दिसून आले होते. म्हणून त्या वाटेने नं जाता बदल करीत शेती करायचे त्याने ठरविले. झाड जसजसे वाढत जाते, तसतशी त्याची तहान पण वाढते. मनुष्याचा नियम झाडाला पण लागतो. झाड वाचता आले पाहिजे. त्याची गरज ओळखली पाहिजे, असे सूत्र अभिजित सांगतो. केळीच्या एका पूर्ण वाढलेल्या झाडास ड्रीप सिस्टीमने ३ तास २० मिनिटे पाणी पुरविणे आवश्यक असल्याचे त्याचे म्हणणे. यावर्षी केळी बहरल्या.
त्या विकायच्या कुठे ? हा प्रश्न पण सुटला. विदर्भ फार्मर्स ही संघटना शेती व्यवहारात आहे. त्याचा अभिजित सदस्य झाला. त्यात मिळालेल्या मार्गदर्शनाने केळी प्रयागराजच्या बाजारात पोहचल्या. तसेच त्याने महाराष्ट्रात पण विक्री केली. हिशोब काढला. सव्वा तीन लाख रुपये खर्च झाला तर उत्पन्न आठ लाखाचे हाती पडले. त्यामुळे उत्साह वाढला. तसेच पुढील जीवनाची दिशा पण बदलून गेली. याच हंगामात आता अभिजित आणखी तीन एकरवर केळी लावणार आहे. नौकरीचे काय, तर तो म्हणतो की शेतीच जर मला आर्थिक उन्नती दाखवीत आहे तर नौकरीच्या भानगडीत पडायचे कशाला, असे त्याचे उत्तर.
बाबांचे एक स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे तो सांगतो. दोन पैकी एका मुलाने तरी आयआयटी मध्ये शिकले पाहिजे, असे स्वप्न. बी. ई. झाल्यानंतर अभिजितने राष्ट्रीय पात्रता परीक्षा देणे सुरूच ठेवले. एकात तो यशस्वी झाला. आयआयटी मद्रास ( अद्याप हेच नाव अधिकृत आहे. )याठिकाणी त्याचा बी. एस. म्हणजे विज्ञान पदवीसाठी प्रवेश झाला. ती पूर्ण करीत वडिलांची ईच्छा पूर्ण करणार. नंतर शेतीच. अशी भावना अभिजित व्यक्त करतो. प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे असे आपण म्हणतो. तेच सूत्र शेतीला पण लागू केले पाहिजे. तेच यशस्वी ठरते, हे अनुभवातून शिकायला मिळाल्याचे तो सांगतो.