चंद्रपूर: शनिवारी सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आज रविवार ११ मे रोजी सकाळी मूल तालुक्यातील महादवाडी येथे जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या विमला बुधा शेंडे (६८) हिचेवर वाघाने हल्ला केला असता तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जिल्ह्यात तेंदुपत्ता हंगाम सुरू आहे. तेंदू पाने गोळा करण्यासाठी गावातील महिला, पुरुष, मूल, मुली सकाळीच जंगलात जातात. उन्हाच्या तीव्रतेने पाण्याच्या शोधात वाघ जंगलात फिरत असतो. त्याच वेळी तेंदुपत्ता तोडण्याचे काम सुरू असते.

जंगलात माणसाला बघून वाघ हल्ला करतात. शनिवारी सिंदेवाही तालुक्यात अशाच प्रकारे तीन महिलांचा मृत्यू झाला. तर आज रविवारी मुल तालुक्यातील महादवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात विमल बुधा शेंडे ही महिला ठार झाली.  नागाला या गावातील रहिवासी असलेली विमला गावातील महिलांसोबत सकाळीच जंगलात गेली होती यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने विमाला हिचेवर हल्ला केला. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटना महादवाडी पिंपळखुट बीट येथे कक्ष क्रमांक ५३७ मध्ये घडली. माहिती मिळताच वन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. गावात वाघाची भीती व तणावाचे वातावरण आहे.