आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गुरुवारी जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. महागाव तालुक्यातील काळीटेंभी येथे नाल्याला आलेल्या पुरात बैलबंडीसह तिघेजण वाहून गेले. सुदैवाने दोघेजण बचावले तर महिला अद्याप बेपत्ता आहे. थोड्या अंतरावर दोन्ही बैल मृतावस्थेत आढळले. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

कमला मारोती पवार (५५ रा. काळीटेंभी) असे पुरात वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. त्या पती मारोती पवार (६०) यांच्यासह शेतात गेल्या होत्या. दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने पवार दाम्पत्य आणि मरगू जाधव हे बैलबंडीने गावाकडे निघाले. पावसामुळे गावालगत असलेल्या नाल्यास पूर आलेला होता. पुरातून बैलबंडी निघेल म्हणून त्यांनी बैलबंडी पाण्यात टाकली. त्याचवेळी पाण्याचा मोठा लोंढा आल्याने बैलबंडीसह मारोती पवार, कमला पवार आणि मरगू जाधव तिघेही वाहत गेले. मारोती व मरगू जाधव यांनी पुरातून पोहत स्वत:चा जीव वाचवला व ते बाहेर आले. मात्र, कमला पवार पुरात वाहून गेल्या. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. या घटनेत दोन्ही बैलांचाही मृत्यू झाला. महसूल व पोलीस यंत्रणा महिलेचा शोध घेत आहे.