यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना येथून महायुतीकडून राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेले काही दिवस येथील उमदेवारीबाबत तिढा निर्माण झाला होता. विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी देण्यास भाजपने तीव्र विरोध केल्यानंतर उमेदवार कोण राहणार, या मुद्यावर राजश्री पाटील यांच्या नावाने आता पडदा पडला आहे.

हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाने जाहीर केलेले महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून बाबूराव कदम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. हेमंत पाटील यांच्या उमदेवारीलाही या लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या तिन्ही आमदारांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे भाजपने पाटील यांच्याऐवजी अन्य उमेदवार देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना केल्याने बाबूराव कदम यांचे नाव पुढे आले. हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्यासमोर यवतमाळ-वाशिमचा पर्याय देण्यात आला. अखेर हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील (महल्ले) यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करणयात आली.

हेही वाचा – “काँग्रेस बाबासाहेबांप्रमाणे बाळासाहेबांनाही निवडून येऊ देत नाही”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

कोण आहेत राजश्री पाटील?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजश्री हेमंत पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी देत एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचे सांगण्यात येते. राजश्री पाटील या मूळच्या यवतमाळच्या आहेत. त्या सध्या गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष आहेत. शिवाय महिलांचे संगठण चालवितात. त्यांना राजकीय वारसा वडिलांकडून मिळाला आहे. त्यांचे वडील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते, तर पती हेमंत पाटील आमदार, खासदार राहिले आहेत. राजश्री पाटील यांची वक्तृत्वशैली मोहवून टाकणारी आहे. सर्वात जमेची बाजू म्हणजे त्या सध्याचा महिला खासदार भावना गवळी यांना महिला उमेदवार म्हणून सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. राजश्री पाटील तिरळे कुणबी समाजाच्या असल्याने यवतमाळ-वाशिममधील या समाजाची दीड लाखांवर मते महायुतीकडे खेचण्यात मोलाचा वाटा उचलू शकतात आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला टक्कर देवू शकतात, असे सांगितल्या जाते. शिवाय भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), आणि मंत्री संजय राठोड, आमदार इंद्रनील नाईक, आमदार नीलय नाईक यांच्या माध्यमातून बंजारा मतांचे ध्रुवीकरणही होवू शकते.

हेही वाचा – आमदार बच्‍चू कडूंचा भाजपला जाहीर सभेत इशारा; म्हणाले, “तुरुंगात टाकले, तरी बेहत्‍तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भावना गवळींच्या निर्णयाकडे लक्ष

महायुतीने भावना गवळींना उमेदवारी दिली नाही तर वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. आता भावना गवळींना डावलण्यात आल्याने त्या काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.