पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेकांची पावले धबधबा, धरण परिसराकडे वळतात. पावसाच्या सरी अंगावर झेलत अशा ठिकाणी भटकंतीची अनेकांची इच्छा असते. चोखंदळ पर्यटनप्रेमींच्या अशा आवडीनिवडी जपण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निसर्गसौंदर्याने नटलेल्या भावली धरण परिसराला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा विचार केला आहे.

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात निसर्गाची मुक्तहस्ते उधळण झाली आहे. सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या या तालुक्यात अनेक धरण आहेत. पावसाळ्यात परिसरात भ्रमंतीसाठी येणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या काही किलोमीटरवर असणाऱ्या भावली धरण परिसरात या काळात ओथंबून वाहणारे धबधबे सर्वाना आकृष्ट करतात. स्थानिक पातळीवरील ही वैशिष्टय़ हेरत मंडळाने भावली धरण आणि लगत वाहणारी नदी याचा विचार करत हे क्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  कुंभमेळ्यादरम्यान मंडळाने ‘नदीकाठी वसलेले गांव’ ही संकल्पना मांडली होती.

त्या अंतर्गत धरणाच्या बॅक वॉटर परिसरात निवासी तंबूंची व्यवस्था करण्यात आली.

मात्र सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाल्यावर तो प्रकल्प तितकासा तग धरू शकला नाही. या प्रकल्पाच्या सर्व शक्यता, त्यातील अडचणीवर काय तोडगा काढता येईल, याचा विचार करत मंडळाने आपल्या स्तरावर भावली धरण परिसराला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, सर्व वयोगटाच्या गरजा लक्षात घेत सोयी सुविधा, त्यासाठी लागणारा निधी या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

धरण परिसरात पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. निवास व्यवस्थेसाठी तंबूची उभारणी, लहान मुलांसह तरुण व क्रीडाप्रेमींकरिता साहसी खेळांची व्यवस्था करण्याचा विचार आहे. याशिवाय भौगोलिक परिस्थिती व उपलब्ध वयोगटानुसार कोणते नवीन प्रकल्प हाती घेता येतील या दृष्टीने चाचपणी केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तंबूला पर्याय म्हणून अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त निवास व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांनी दिली.