जळगाव : बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चे घटक पक्ष भाजपा, जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाने जोरदार विजय मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. या निकालानंतर महाराष्ट्रातही महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी जल्लोष केला आहे. बिहारमधील निकालाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीला निश्चित फायदा होईल, असा विश्वास शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनीही व्यक्त केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांनी प्रभावी कामगिरी करत मोठा विजय मिळवला असून, एनडीएने आरामात बहुमताचा टप्पा पार केला आहे. याउलट, आरजेडीला ३० पेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसची स्थिती तर अधिकच खालावलेली दिसली आणि पक्षाला १० जागांचाही आकडा गाठता आला नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली.
भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. पक्षाने ११० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते, ज्यांची कामगिरी विशेष दखलपात्र ठरली. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पार्टीने (रामविलास) सुद्धा चांगली झेप घेत १९ जागांवर विजय मिळवला.
लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजप्रताप यादव याचा बिहार निवडणुकीत पराभव झाला आहे. तेजप्रताप यादव स्वतः महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. तसेच प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला बिहार निवडणुकीत एकूण ३.४४ टक्के मते मिळाली आहेत. लढवलेल्या २३८ जागांपैकी ६८ जागांवर ते नोटापेक्षा मागे राहिले.
दरम्यान, महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी बिहार निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना बिहारच्या जनतेने एनडीएला स्पष्ट बहुमत दिलेले नाही, तर लाडकी बहीण योजनेला बहुमत दिल्याची टीका त्यांनी केली आहे. लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशातून आधी महाराष्ट्रात, त्यानंतर बिहारमध्ये पोहोचली. इथे महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना १५०० रूपये दिले, तर तिथे बिहारमध्ये तब्बल १० हजार रूपये दिले. अर्थात, १० हजार रूपयांच्या प्रलोभनामुळे महिलांनी एनडीएला मोठ्या प्रमाणावर मतदान केले, असेही आमदार खडसेंनी म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मिळालेले बहुमत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कामगिरीचे फलित नसून, प्रत्येक घरात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचे वाटप झाल्यानंतर निर्माण झालेल्या प्रलोभनाचा परिणाम आहे, अशीही टीका आमदार खडसे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की महाराष्ट्रात ज्या प्रमाणे लाडकी बहीण योजनेची जादू चालली, त्याच पद्धतीने बिहारमध्ये लाडकी बहीण योजनेची जादू चाललेली दिसते.
बिहारमध्ये जवळपास ७१ टक्के मतदान हे महिलांनी केले असून, महिलांचा उत्साह मतपेटीवर प्रदर्शित झाला आहे. बिहार निवडणुकीतील एनडीएच्या विजयाचा परिणाम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही होईल. महायुतीच सगळीकडे आगेकूच करेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
